राजपथ गाजविणाऱ्या कलावंतांचे भावपूर्ण स्वागत
By Admin | Updated: January 31, 2015 02:20 IST2015-01-31T02:20:31+5:302015-01-31T02:20:31+5:30
शहराच्या शिरपेचात यंदाच्या गणतंत्र दिन परेडमध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे. नागपूरकर कलावंतांनी सादर केलेल्या ‘लेझिम पथकाला’ राष्ट्रीय ...

राजपथ गाजविणाऱ्या कलावंतांचे भावपूर्ण स्वागत
नागपूर : शहराच्या शिरपेचात यंदाच्या गणतंत्र दिन परेडमध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे. नागपूरकर कलावंतांनी सादर केलेल्या ‘लेझिम पथकाला’ राष्ट्रीय स्तरावरील प्रोत्साहन पुरस्कार मिळाल्याने नागपूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शहरातील विद्यार्थ्यांनी राजपथावर आर. डी. परेडमध्ये सादर केलेल्या या लेझिम नृत्याने देशवासीयांची मने जिंकली. आज हे सारेच कलावंत नागपुरात परतले. याप्रसंगी नागपूरकरांनी भारतमातेच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून टाकला आणि पुष्पहार, पुष्पगुच्छ देत या सर्व यशस्वी शालेय विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत केले.
सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास गोडवाना एक्स्प्रेसने या कलावंतांचे नागपुरातील मुख्य रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर आगमन झाले. यात एकूण १६० कलावंतांचा सहभाग होता. याशिवाय २० शाळांचे शिक्षकही या समूहात सहभागी होते. राजपथावर सादरीकरण करण्यासाठी गेलेल्या १६० विद्यार्थ्यांत एकूण ८७ मुली आणि ७३ मुले होते. आज हे सारेच कलावंत महिनाभरानंतर दिल्लीहून परत येणार असल्याने सारेच त्यांना पाहण्यासाठी उत्सुक होते. विद्यार्थ्यांच्या पालकांसह, त्यांचे भाऊ-बहीण आणि नातेवाईंकांनी यावेळी प्रचंड गर्दी रेल्वे स्थानकावर केली. प्लॅटफार्म क्रमांक सहावर तर पाय ठेवायलाही जागा नव्हती. अनेक लोक रेल्वे स्थानकासमोरही पुष्पगुच्छ घेऊन उभे होते. गोंडवाना एक्स्प्रेसचे आगमन झाल्यावर उत्स्फूर्तपणे भारत की माता की जय च्या घोषणा देण्यात आल्यात. त्यामुळे रेल्वे स्थानकाचे वातावरणच बदलले. प्रत्येकाच्या हातात पुष्पहार आणि पुष्पगुच्छ असल्याने इतर प्रवाशांमध्येही प्रचंड कुतूहल निर्माण झाले. या रेल्वेगाडीने कुणी मोठा नेता येणार आहे का, अशी विचारणा लोक परस्परांजवळ करीत होते. पण राजपथावर सादरीकरण करणारे यशस्वी विद्यार्थी येणार आहेत, हे कळल्यावर प्रत्येकालाच त्याचा अभिमान वाटत होता. गाडी आली आणि विद्यार्थी प्लॅटफॉर्मवर उतरत असताना पालक आणि नातेवाईंकानी एकच जल्लोष करीत या विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत केले. या स्वागताने सारेच भारावले होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गळ्यात पुष्पहार होता त्यामुळे अख्खे वातावरणच फुलांनी भारले गेले. हा नागपूरकरांच्या आयुष्यातला खरेच सुवर्णक्षण होता. नागपूरच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवणाऱ्या या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूषकुमार यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी दिल्लीतील अनुभवाबाबत प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी आपले अनुभव लोकमतजवळ शेअर केले. (प्रतिनिधी)