Union Minister Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखळे जातात. कामं न करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही सुनावताना ते मागे पुढे पाहत नाही. सरकारबाबतही ते अनेकदा बेधडकपणे बोलत असतात. अशातच नागपुरात बोलत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रोखठोक मत मांडले. सरकार हे निरुपयोगी असतं, चालत्या गाड्या पंक्चर करण्यात निष्णात असतं, असं ते म्हणालेत. काही कामांबद्दल सरकार अनास्था याबाबत बोलताना नितीन गडकरी यांनी हे विधान केलं आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे पुन्हा एकदा त्यांच्या स्पष्टवक्तेपणा चर्चेत आले आहेत. नागपूरमधील सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यासपीठावरूनच सरकारी यंत्रणा निकम्मी असल्याचे म्हटलं. नितीन गडकरींनी सरकार निरुपयोगी असतं असं म्हणताच कार्यक्रमात उपस्थित असलेले लोक काही क्षणांसाठी शांत झाले. पण नितीन गडकरी इथेच थांबले नाहीत. त्यांनी सरकारी यंत्रणा, महानगरपालिका आणि इतर यंत्रणांच्या कार्यशैलीवरही ताशेरे ओढले.
विदर्भ एडव्हेंचर असोसिएशन, नागपूरतर्फे भट सभागृहात आयोजित ‘स्पोट्स ॲज ओ करियर सेमिनार’मध्ये नितीन गडकरी बोलत होते. सरकारी यंत्रणा फक्त चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम करते. मला नागपुरात ३०० स्टेडियम बांधायचे आहेत. पण सरकारी प्रक्रिया आणि व्यवस्था यामध्ये अडथळे निर्माण करत असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटलं.
"चांगले दिवस सुरू असल्यास लोक तोंडावर प्रशंसा करतात. पण हे दिवस निघून गेल्यावर अडचणीच्या काळात कोणीही विचारत नाही. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात मेहनत घेऊन प्रत्येकाने चांगले करियर घडवायला हवे. मी फायनान्शियल तज्ज्ञ, अकाउंटंट नाही. पण चांगला फायनान्शिलय समुपदेशक आहे. मी पाच लाख कोटी रुपयांपर्यंतचे रस्ते-पुलाचे काम हातात पैसे नसतांनाही करतो," असं नितीन गडकरी म्हणाले.