सरकारने २५० युनिटचा स्लॅब करावा
By Admin | Updated: August 23, 2014 03:09 IST2014-08-23T03:09:55+5:302014-08-23T03:09:55+5:30
संपूर्ण भारतात सर्वाधिक वीज महाराष्ट्रात तयार होते. मात्र महाराष्ट्रातच विजेचा दर सर्वाधिक आहे.

सरकारने २५० युनिटचा स्लॅब करावा
नागपूर : संपूर्ण भारतात सर्वाधिक वीज महाराष्ट्रात तयार होते. मात्र महाराष्ट्रातच विजेचा दर सर्वाधिक आहे. संपूर्ण भारतात २५० युनिटचा स्लॅब असतांना महाराष्ट्रात १०० युनिट नंतर स्लॅब बदलल्या जातो आहे. या कारणामुळे मध्यमवर्गीयांवर वीज बिलाचे फार मोठे संकट ओढवले आहे. एकीकडे महागाईने होरपळलेल्या जनतेसमोर वीज बिलाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे सरकारने ताबडतोब २५० युनिटचा स्लॅब करावा, अशी मागणी मनसेचे उपशहरप्रमुख प्रशांत पवार यांनी केली. अन्यथा सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.
एसएनडीएल संदर्भात वीज ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींचे निराकरण करून त्यांना आर्थिक दिलासा देण्याच्या उद्देशाने स्थानिक गड्डीगोदाम भागातील आंबेडकर हॉल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व एसएनडीएल यांच्या संयुक्त विद्यमाने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले़
या जनता दरबारात एनएसडीएलचे अधिकारी व मनसेतर्फे प्रशांत पवार उपस्थित होते. जनता दरबारात गड्डीगोदाम भागातील ३०० नागरिकांनी आपल्या समस्या एसएनडीएलचे अधिकारी तसेच मनसेचे प्रशांत पवार यांच्यापुढे सादर केल्या़
येथील ग्राहकांच्या मीटरचे केवळ दोन महिन्यांचे रिडींग घेऊन, सातत्याने सहा-सहा महिने देयके पाठविण्यात येत होती़ अशा तक्रारी असणाऱ्या ग्राहकांची मीटर तपासणी करून ग्राहकांना लगेच सुधारित देयके देण्यात आली़ त्याचप्रमाणे वस्तीतील लोकांची देयके ताबडतोब कमी करून देण्यात आली व अॅव्हरेज बिल फक्त दोन महिन्यापुरते देण्यात येईल ही बाब अधिकाऱ्यांनी मान्य केली़
जनता दरबारात हे लक्षात आले की, कॉंग्रेस - राष्ट्रवादी या सरकारने वीज निर्मिती व वितरणात येणारे सर्व लॉसेस सर्वसामान्य जनतेकडून वसूल करणे सुरू केले आहे. त्यामुळे विजेचे बिल मोठ्या प्रमाणात येत आहे. तसेच एसएनडीएलने बदललेले मीटर फार वेगाने फिरते असे लक्षात आले़ मीटर बदलविल्यानंतर सुरुवातीचे २ ते ३ महिने मीटर व्यवस्थित फिरतात त्यानंतर फार गतीने फिरतात़ ग्राहकांवर भूर्दंड बसविणारे मीटर, अशी मागणीही पवार यांनी केली. अन्यथा मनसे उर्जा मंत्र्याला नागपुरात फिरू देणार नाही असा इशारा प्रशांत पवार यांनी दिला़
जनता दरबारात जगदीश गुप्ता, इर्शाद कुरेशी, फिलीप जोसफ, युवराज कोकाडे, युनुस कुरेशी व इतर असंख्य नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले़
याप्रसंगी मनसेचे मिलिंद महादेवकर, राकेश बांगरे, अनिस भाई, आदीलभाई कुरेशी, पीटर शेरेकर, संजय मेश्राम, सोनु भाई, राकेश मिश्रा, राहुल मसराम, मुन्नाभाई, नीरज फुले, अस्लमभाई, अमित समुंद्रे, जावेदभाई कुरेशी, सोनु डकाह, रोहीत अरखेल, तौशिक कुरेशी, इमराज कुरेशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)