सरकार नव्हे समाजाच्या सक्रियतेमुळे देश चालतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 02:41 IST2016-04-25T02:41:58+5:302016-04-25T02:41:58+5:30

सरकारकडून विविध मुद्यांवर अपेक्षा करण्याचे प्रस्थ वाढले आहे. यातून सरकारला उठसूठ विचारणादेखील केली जाते.

Government does not run the country because of the activism of the society | सरकार नव्हे समाजाच्या सक्रियतेमुळे देश चालतो

सरकार नव्हे समाजाच्या सक्रियतेमुळे देश चालतो

मोहन भागवत : ‘सारथी’ संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा
नागपूर : सरकारकडून विविध मुद्यांवर अपेक्षा करण्याचे प्रस्थ वाढले आहे. यातून सरकारला उठसूठ विचारणादेखील केली जाते. यामुळे जगातील लोकांना हा देश नेमका चालतो कसा असा प्रश्न पडतो. यातून विनोदही होतात. परंतु सर्वांनी लक्षात घ्यायला हवे की हा देश सरकार नव्हे तर समाजाची सक्रियता व गुणवत्तेवर चालतो, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केंद्रावर टीका करणाऱ्यांना चिमटा काढला आहे. नागपुरातील ‘सारथी’ या स्वयंसेवी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्ष समारंभाप्रसंगी रविवारी ते बोलत होते.
सिव्हील लाईन्स येथील चिटणवीस केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी पुण्यातील उद्योजक डी. एस. कुळकर्णी, ‘सारथी’चे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध वझलवार, संस्थापक सचिव अमर वझलवार, अध्यक्ष मधुकर आपटे, कार्याध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र राठी व ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक हे प्रामुख्याने उपस्थित होते. सत्ताधीशांच्या हाती अनेक मुद्यांचे केंद्रीकरण झाले आहे. परंतु देशाची लोकसंख्या लक्षात घेता केवळ राजकीय पक्ष, राजकारणी व नोकरशहा यांच्या भरवशावर देश चालू शकत नाही. इंग्रजांनी देश चालविला नव्हता, तर राज्य केले होते. तीच पद्धत आपण अनुसरतो आहोत. परंतु देश त्या तंत्रावर चालत नाही याचा आपल्याला विसर पडला आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा पुढाकार महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे परोपकार व लोककल्याणाची भावना लोकांमध्ये जागृत होईल तेव्हा खरी प्रगती साधली जाईल. गेल्या काही काळापासून जनतेची सक्रियता वाढते आहे ही दिलासा देणारी बाब आहे, असे डॉ.भागवत म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन झाले. शिवाय राजन दंडिगे व हेमंत अंबादे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिरुद्ध वझलवार यांनी केले. प्रभा देऊस्कर यांनी संचालन केले तर मधुकर आपटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Government does not run the country because of the activism of the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.