स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी शासन सकारात्मक

By Admin | Updated: August 22, 2016 02:41 IST2016-08-22T02:41:27+5:302016-08-22T02:41:27+5:30

विदभार्तील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळविता यावे यासाठी पुण्यातील ‘यशदाह्ण संस्थेच्या धर्तीवर

Governance positive for competitive examination center | स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी शासन सकारात्मक

स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी शासन सकारात्मक

४२ कोटींच्या प्रस्तावाला हिरवी झेंडी ? : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे सूतोवाच
नागपूर : विदभार्तील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळविता यावे यासाठी पुण्यातील ‘यशदाह्ण संस्थेच्या धर्तीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापना करण्याचे प्रयत्न सुरू आहे. या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी शासन सकारात्मक असून ४२ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्यात येईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. रविवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित राज्यस्तरीय समाजप्रबोधन विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
राज्यभरातील विद्यापीठांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंतीवर्षाच्या निमित्ताने विदर्भातील सर्व विद्यापीठांनी मिळून या परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे अध्यक्षस्थानी होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर,महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए.के. मिश्रा, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उमा वैद्य, तसेच नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले विशेषत्वाने उपस्थित होते.
विद्यापीठांमध्ये वैचारिक परिवर्तनाची प्रचंड शक्ती आहे. बाबासाहेबांचे विचार हे सर्वसमावेशक होते. परंतु त्यांच्या विचारांची योग्य अंमलजबजावणी झालीच नाही. यादृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे बडोले म्हणाले. विषमता, जातीयवदा ही देशाला लागलेली कीड होती. बाबासाहेबांमुळे कोट्यवधी वंचित जनतेला न्याय मिळाला. शिक्षणातून समाजात बदल होतो. परंतु केवळ पदवी असणे आवश्यक नाही तर विद्येसोबत शीलदेखील असले पाहिजे, असे मत डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले. उपोषण, कायदेभंग, मोर्चा ही शस्त्रे बोथट झाले असल्याचे वक्तव्यदेखील यावेळी डॉ.काणे यांनी केले. पूरण मेश्राम यांनी प्रास्ताविक केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले तर डॉ.निहाल शेख यांनी आभार मानले.
विविध विद्यापीठांतील सुमारे हजार विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सामाजिक विषयांवर सादरीकरण केले .परिषदेचे फलित म्हणून या ठरावांची सनद एका कृती कार्यक्रमाच्या स्वरूपात केंद्र शासन, राज्य शासन व विविध विद्यापीठांना सोपविली जाणार आहे.(प्रतिनिधी)

आठवले, मंजुळे, थोरात आलेच नाहीत
या परिसंवादादरम्यान नियोजित वेळापत्रकानुसार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणतज्ज्ञ डॉ.सुखदेव थोरात व प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे येणार होते. या तिघांनाही ऐकण्यासाठीदेखील विद्यार्थी उत्सुक होते. परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे दोघेही येऊ शकले नाही. त्यामुळे काही प्रमाणात उपस्थितांच्या उत्साहावर विरजण पडले.
कुलगुरू, अधिकारी थांबलेच नाहीत
उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर दिवसभर विविध विषयांवर वैचारिक मंथन झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंच भरलेला होता. परंतु परिसंवादाच्या वेळी मंचावर समोरच्या रांगेत केवळ नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते. बाकी विद्यापीठांचे विद्यार्थी दिवसभर सभागृहात होते. परंतु काही कुलगुरू व अधिकाऱ्यांनी मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर होत असताना, तेथे थांबण्याची तसदी घेतली नाही.
बडोले माजी महाधिवक्त्यांचे नावच विसरले
अ‍ॅड.श्रीहरी अणे हे राज्याचे माजी महाधिवक्ता होते. शासनाच्या विविध प्रकरणांना त्यांनी न्यायालयात मांडले होते. परंतु राजकुमार बडोले यांना अ‍ॅड.अणे यांच्या नावाचाच विसर पडला. विदर्भाच्या मुद्यामुळे विदर्भातील नागरिकांना अणे यांचे नाव नवीन राहिलेले नाही. परंतु बडोले यांनी ‘अणे’ यांच्या नावाचे संबोधन चक्क ‘काणे’ असे केले. त्यामुळे उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले.

Web Title: Governance positive for competitive examination center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.