मुलींचा जन्मदर वाढला
By Admin | Updated: June 23, 2014 01:27 IST2014-06-23T01:27:15+5:302014-06-23T01:27:15+5:30
जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात लक्षणीय सुधारणा झाली असून एक हजार मुलांच्या मागे मुलींची संख्या ९५६ झाली आहे. २०११ पासून राज्यात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला.

मुलींचा जन्मदर वाढला
एक हजार मुलांच्या मागे मुलींची संख्या ९५६
नागपूर: जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात लक्षणीय सुधारणा झाली असून एक हजार मुलांच्या मागे मुलींची संख्या ९५६ झाली आहे.
२०११ पासून राज्यात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला. त्यानंतर अवैधपणे गर्भलिंग तपासणी करणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली. त्याचाही परिणाम मुलींचा जन्म दर वाढण्यात झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे यांनी याबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन करण्यात आले असून त्याची बैठक शुक्रवारी झाली. २०११ ते २०१३ या दरम्यान स्त्री भ्रूणहत्येशी संबंधित २५ तक्रारी प्राप्त झाल्या. हिंगणा व नागपूरमध्ये अनुक्रमे डॉ. नागपुरे व डॉ. प्रकाशे यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. डॉ. प्रकाशे यांच्या विरोधातील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. उर्वरित २३ पैकी १० तक्रारी खोट्या असल्याच्या आढळून आल्या व १३ तक्रारींवर कारवाई केली जात आहे. जानेवारी २०१४ पासून आतापर्यंत यासंदर्भातील एकही तक्रार प्राप्त झाली नाही, असे वानखडे म्हणाले.
महाराष्ट्र गर्भ लिंग चाचणीवर बंदी असल्याने महिला मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात तपासणीसाठी जातात व नागपुरात येऊन गर्भपात करतात. त्यामुळे संबंधित राज्यांना यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे. स्त्री भ्रूणहत्येच्या संदर्भात जनजागृतीवर भर दिला जात आहे. यासाठी सामाजिक तसेच स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे. २०१३-१४ या वर्षात शहरातील सोनोग्राफी केंद्राची तपासणी करण्यात आली. त्यात अनियमितता आढळून आल्याने ३२ केंद्रांना नोटीस बजावण्यात आली.(प्रतिनिधी)