यंत्रणा उभारली तर अंत्यसंस्काराच्या यातनातून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:08 IST2021-04-08T04:08:40+5:302021-04-08T04:08:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या पाच हजारांवर गेली आहे. शहरातील आकडाही वाढत आहे, सोबतच ...

Get rid of the torment of cremation if the system is set up | यंत्रणा उभारली तर अंत्यसंस्काराच्या यातनातून सुटका

यंत्रणा उभारली तर अंत्यसंस्काराच्या यातनातून सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या पाच हजारांवर गेली आहे. शहरातील आकडाही वाढत आहे, सोबतच मृत्यूचा आकडा वाढत आहे. दररोज शंभराहून अधिक मृत्यू होत असल्याने दहन घाटावर अंत्यसंस्कारासाठी वेटिंग आहे. घाटावर सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मोफत लाकडे उपलब्ध केली म्हणजे जबाबदारी संपली, असा याचा अर्थ होत नाही. बदलत्या परिस्थितीत घाटावर आधुनिक सुविधा उपलब्ध कराव्या लागतील. शहरातील सर्व १६ दहन घाटावर विद्युत वा एलपीजी शवदाहिनीची सुविधा निर्माण केली तर अंत्यसंस्कार सुलभ होतील. कोरोनामुळे महापालिकेला ही संधी प्राप्त झाली आहे. प्रशासनाने नियोजन करून यासाठी आर्थिक तरतूद करून घाटांचा विस्तार, सौंदर्यीकरण, नवीन घाटांची निर्मिती ही काळाची गरज आहे.

मनपाचे १६ दहन घाट आहेत. यापैकी मोक्षधाम, अंबाझरी व सहकारनगर या घाटावर विद्युत दाहिनी तर गंगाबाई व वैशालीनगर घाटावर एलपीजी दाहिनीची सुविधा आहे. अन्य घाटावर अंत्यसंस्कारासाठी लाकूड वा काष्ठ वापरले जातात. यावर मनपाला मोठा खर्च करावा लागतो. विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार केल्यास प्रत्येक अंत्यसंस्कारामागे एक हजाराची बचत होऊन पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करता येतील. मनपा अर्थसंकल्पात घाटांची देखभाल करण्यासाठी पाच ते सहा कोटीची तरतूद केली जाते. यातील मोठा निधी लाकडावर खर्च केला जातो. हा खर्चही कमी होईल.

....

दाहिनीमुळे वेळ व खर्चात बचत

विद्युत वा एलपीजी शवदाहिनीत एका दिवशी सहा अंत्यसंस्कार करणे शक्य होते. दुसरीकडे एका ओट्यावर एकच अंत्यसंस्कार करता येतो. ओट्यावरील राख उचलल्याशिवाय दुसरा अंत्यसंस्कार करता येत नाही. दुसरीकडे अंत्यसंस्कारासाठी लाकूड व गोवऱ्याचा वापर केल्यास यावर अडीच ते तीन हजार रुपये खर्च होतो. विद्युत दाहिनीसाठी दीड हजार खर्च येतो. यामुळे मनपाची आर्थिक बचत होईल तसेच वेळेचीही बचत होईल.

...

शहरालगत घाट निर्माण करावे

नागपूर शहराची लोकसंख्या वाढत आहे. काही घाट लोकवस्तीत आहेत. अशा घाटावरील भार कमी करण्यासाठी शहरालगतच्या भागात नवीन घाटाची निर्मिती करणे गरजेचे आहे. यासाठी जागा व निधी उपलब्ध करण्याची गरज आहे.

...

घाटावर या सुविधा असाव्यात

- विद्युत वा एलपीजी शवदाहिनी

- घाट परिसराचे सौंदर्यीकरण

- पाण्याची व्यवस्था

- विधीसाठी शेडचे निर्माण

- परिसरात बांधकाम व टाईल्स लावणे

- शौचालय व मुतारीची व्यवस्था

...

शहरातील प्रमुख घाट

सहकारनगर

अंबाझरी

फ्रेंड्‌स कॉलनी

मानेवाडा

मोक्षधाम

दिघोरी

वाठोडा

गंगाबाई

शांतिनगर

पारडी

वैशालीनगर

नारी

मानकापूर

नारा

जयताळा

Web Title: Get rid of the torment of cremation if the system is set up