अवयवदानानंतरही जगू शकतो सामान्य जीवन
By Admin | Updated: August 13, 2016 02:30 IST2016-08-13T02:30:28+5:302016-08-13T02:30:28+5:30
किडनी, यकृत किंवा इतर अवयव दानानंतर माणूस सामान्य जीवन जगू शकत नाही अशी भीती किंवा संभ्रम लोकांमध्ये असते.

अवयवदानानंतरही जगू शकतो सामान्य जीवन
ब्रॅन्ड अॅम्बेसडर जुही पवारचा विश्वास : युवकांना पुढे येण्याचे आवाहन
नागपूर : किडनी, यकृत किंवा इतर अवयव दानानंतर माणूस सामान्य जीवन जगू शकत नाही अशी भीती किंवा संभ्रम लोकांमध्ये असते. मात्र ही भीती पूर्णपणे चुकीची आहे. अवयवदान करणारी व्यक्ती वजन उचलण्यापासून जलतरण करण्यापर्यंत कोणतेही कार्य अगदी सहज आणि सामान्य लोकांप्रमाणे करू शकते हा विश्वास वडिलांना आपले यकृत दान करणारी आणि आता अवयवदानाची राज्य शासनाची ब्रँड अॅम्बेसडर जुही पवार हिने दिला.
मूळची जळगावची जुही सध्या मुंबईच्या सोमय्या वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिने मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेतही सहभाग घेतला आहे. मात्र तिची ओळख तिने केलेल्या अद्वितीय कार्यामुळे आहे. वडिलांचा यकृताचा आजार बळावला तेव्हा ती अवघ्या १९ वर्षाची होती व वैद्यकीय महाविद्यालयात नुकताच प्रवेश केला होता. मात्र वडिलांचा त्रास पाहून तिने मोठा निर्णय घेतला. स्वत:च्या यकृताचा भाग वडिलांना देण्याचा. वडिलांसह अनेकांनी तसे करण्यास तिला मनाई केली. मात्र डॉक्टरांशी चर्चा करून तिने यकृताचा ७० टक्के भाग वडिलांना दिला. तिच्या साहसाची दखल घेत सरकारने मागील वर्षी अवयव दानाची अग्रदूत म्हणून निवड केली.
अवयदानाच्या जनजागृतजीसाठी आयोजित एका कार्यक्रमासाठी नागपूरला आलेल्या जुहीने ‘लोकमत’शी बोलताना अवयव दानाबाबत आपले मत व्यक्त केले. भारतात दोन लाख किडनी आणि जवळपास एक लाख यकृताची आवश्यकता आहे.
मात्र अवयवदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. क्रोएशिया, स्पेनसारख्या देशांमध्ये अवयव दान करणाऱ्यांचे प्रमाण बरेच आहे. देशात १० लाखांमधून एक व्यक्ती जरी अवयवदानासाठी पुढे आली तर सर्वांची गरज पूर्ण होईल, असा विश्वास तिने व्यक्त केला. तामिळनाडू आणि इतर दक्षिणात्य राज्यात अवयदानाबाबत आनंददायक वातावरण असल्याचे तिन सांगितले.(प्रतिनिधी)
अवयवदानावर जनजागृती रॅली आज
डॉ. रवी वानखेडे म्हणाले, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त झोनल ट्रान्सप्लॅन्ट कोआॅर्डिनेशन सेंटर, मोहन फाऊंडेशन नागपूर केंद्र व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे १३ आॅगस्ट रोजी अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जुही पवार या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. सकाळी ९.३० वाजता बजाजनगर येथील मातृ सेवा संघाच्या प्रांगणातून अवयवदान जनजागृती पदयात्रा रॅलीला सुरुवात करण्यात येईल. महापौर प्रवीण दटके हिरवी झेंडी दाखवतील. एलएडी महाविद्यालयात रॅलीचे समापन होईल. पत्रपरिषदेला निवृत्त एसीपी चंद्रकांत उद््गीकर, चारुलता बावनकुळे, डॉ. डी.जी. वाघमारे, मातृ सेवा संघाचे डॉ. जॉन मेनॉचरी, विद्यापीठाचे एनएसएसचे समन्यवयक डॉ. भाऊ दायदार प्रामुख्याने उपस्थित होते.