कचरा संकलन वाहनांतूनच कचरा रस्त्यावर विखूरला जातोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST2021-05-25T04:08:39+5:302021-05-25T04:08:39+5:30
- ओव्हरलोडमुळे कचरा घरादारापर्यंत उडतो लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील घराघरांतून कचरा संकलित केल्यानंतर भांडेवाडी डम्पिंग यार्डापर्यंत तो ...

कचरा संकलन वाहनांतूनच कचरा रस्त्यावर विखूरला जातोय
- ओव्हरलोडमुळे कचरा घरादारापर्यंत उडतो
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील घराघरांतून कचरा संकलित केल्यानंतर भांडेवाडी डम्पिंग यार्डापर्यंत तो कचरा वाहून नेणारी वाहने नागरिकांसाठी मोठी समस्या निर्माण करत आहेत. अर्ध्याअधिक कचरा डम्पिंग यार्डपर्यंत पोहोचण्याआधीच तो रस्त्यावर विखुरला जात असल्याचे चित्र आहे.
महानगरपालिकेच्या वतीने शहरातून कचरा संकलन करण्यासाठी दोन मोठ्या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे. एजी व बीव्हीजी या कंत्राटी कंपन्यांची वाहने हा कचरा घरादारातून संकलित केल्यानंतर पूर्व नागपुरात असलेल्या भांडेवाडी डम्पिंग यार्डात फेकतात. मात्र, यादरम्यान येणाऱ्या वाठोडा परिसरातील वस्ती संकलन वाहनांच्या बेमुर्वतपणामुळे त्रस्त आहेत. या कंपन्यांची वाहने कचरा गरजेपेक्षा जास्त भरत असल्याने मार्गात कचरा उडवत जातात. वाहनातील कचरा उडून इतस्तत: पसरतो. बरीच वाहने ताडपत्रीने तो कचरा झाकत नसल्याचेही चित्र आहे. यासोबतच काही वाहनांना भगदाड पडले असल्याने कचरा रस्त्यावरच पडत जातो. त्यामुळे ही वाहने कचरा संकलन करणारी आहेत की कचरा पसरवणारी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
------------------
या वाहनांवर दंड लावावा
कचरा संकलन करणाऱ्या वाहनांमध्ये कचरा गरजेपेक्षा जास्त भरला जातो आणि नंतर हा कचरा रस्त्यावरच विखुरला जातो. त्यामुळे, रस्त्यावरच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नंतर हा कचरा साफही केला जात नाही. मनपा प्रशासनाने या वाहनांवर दंड लावण्याची गरज आहे.
- गौरव गुप्ता, युवा समाजसेवक, सूरजनगर
------
वाहनांचा वेगही भरपूर असतो
कचरा संकलन करणारी ही वाहने अत्यंत वेगाने धावतात. त्यानंतर हा कचरा थेट घरादारापर्यंत उडून येतो. अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, लक्ष देणारी यंत्रणा झोपेत असल्याचे दिसून येते.
- मुज्जू शेख, धरतीमातानगर
--------------
आधीच रिंग रोड ते डम्पिंग यार्डापर्यंतचा रस्ता अनेक खड्डे पडलेला आहे. या रस्त्यावरून वॉटर टँकर्स मोठ्या संख्येने धावतात. त्यामुळे चिखल असतोच. त्यात कचरा रस्त्यावर विखुरल्याने दुर्गंधी कायम असते.
- पप्पू शाहू, संघर्षनगर
------------------
वाहनांचा आवाजही मोठा
ही वाहने थकलेली आहेत. शिवाय, रस्ता खराब असल्याने कचरा संकलन करणाऱ्या वाहनांचा आवाजही फार मोठा असतो. दुरुस्ती केली तर कचरा रस्त्यावर पसरणार नाही आणि आवाजही होणार नाही.
- अनिकेत कोंडेकर, पवनशक्तीनगर
------------
वाहनचालक अरेरावी करतात
बरेचदा वाहने हळू चालवा आणि कचरा उडणार नाही, अशी ताकीद देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मात्र, वाहन चालक अरेरावी करतात आणि पुढे निघून जातात.
- अकिल शेख, पवनशक्तीनगर
.............