गडकरींना आयटीची क्लीन चिट
By Admin | Updated: May 13, 2014 00:19 IST2014-05-13T00:19:44+5:302014-05-13T00:19:44+5:30
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना प्राप्तिकर विभागाने (आयटी) एकप्रकारे क्लीन चिट दिली आहे. गडकरींच्या विरोधात आयटी विभागाने काय काय कारवाई केली,

गडकरींना आयटीची क्लीन चिट
माहितीच्या अधिकारात उघड : चौकशी केलीच नसल्याची स्पष्टोक्ती नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना प्राप्तिकर विभागाने (आयटी) एकप्रकारे क्लीन चिट दिली आहे. गडकरींच्या विरोधात आयटी विभागाने काय काय कारवाई केली, अशी माहिती माहितीच्या अधिकारात मागविण्यात आली होती. त्यावर दिलेल्या माहितीनुसार आयटी विभागाने गडकरींशी संबंधित कोणत्याही कंपन्यांवर धाडी घातल्या नाही व चौकशीही केली नाही, असे स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणूक निकालाच्या तोंडावर सरकारकडूनच क्लीन चिट मिळाल्यामुळे गडकरींना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांचा पुढील राजकीय प्रवास सुकर होण्याची चिन्हे आहेत. गडकरी यांनी हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गडकरी यांनी राजकारणासोबतच उद्योग क्षेत्रात भरारी घेतली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपविली होती. गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी सलग दुसर्यांदा संधी देण्याची तयारी पक्षाने सुरू केली होती. त्यासाठी पक्षाची घटना बदलविण्यात आली. मात्र, नेमके त्याच काळात गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूह व इतर कंपन्यांवर आयटी विभागाने छापे घातले होते. अनेक कंपन्यांची नोंदणी बोगस कागदपत्रांच्या आधारावर करण्यात आली आहे, कंपन्यांमध्ये गैरव्यवहार आहेत, असे आरोप झाले होते. सत्य अस्वस्थ होईल, पराभूत नाही - गडकरी यूपीए सरकारच्या कार्यकाळात माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे खोटे व चुकीचे असल्याचे सिद्ध झाले. हा सत्याचा विजय आहे. मी आधीपासूनच ठामपणे सांगत होतो की, मी कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही. त्यासाठी कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी मी दर्शविली होती. अखेर सत्य बाहेर आले, अशी सद्गदित प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी पुढे म्हणाले की, सत्य अस्वस्थ होईल, पण पराभूत नाही. याचा अनुभव आज मी घेतला. या काळात मला प्रचंड मानसिक त्रास झाला. सार्वजनिक जीवनात माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. पण माझे मन मला सांगत होते की, जे खरे असेल ते लवकरच समोर येईल. यूपीए सरकारच्या काळात हे आरोप झाले आणि त्यांच्याच कार्यकाळात मला क्लीन चिट मिळाली, ही फार समाधानाची गोष्ट आहे. ज्यांनी यातना दिल्या त्यांनाच फुले द्यावी लागली, हा नियतीने या सरकारवर उगवलेला सूड आहे. आमचे सरकार आल्यानंतर जर ही क्लीन चिट मिळाली असती तर लोकांनी शंकेने बघितले असते. परंतु यूपीए सरकारच्या काळातच दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले. हे फार मोठे समाधान असल्याचेही गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी) खुलासा दिलासादायक गडकरींच्या कंपन्यांचा मुद्दा राजकीय वतरुळातही जोरात गाजला. आता मात्र लोकसभेसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू असताना व निकाल येण्यास चार दिवस उरले असताना गडकरींच्या कंपन्यांची कुठलीही चौकशी केली नाही, असा आयटी विभागाने केलेला खुलासा गडकरींसाठी दिलासादायक ठरणारा आहे.