भारताच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र तिबेटची गरज
By Admin | Updated: July 7, 2015 02:42 IST2015-07-07T02:42:27+5:302015-07-07T02:42:27+5:30
चीनचे विस्तारवादी आणि साम्राज्यवादी धोरण लक्षात घेता भारताच्या सुरक्षेसाठी तिबेट हा स्वतंत्र देश असणे गरजेचे आहे,...

भारताच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र तिबेटची गरज
समता सैनिक दल : विमलसूर्य चिमणकर यांचे प्रतिपादन
नागपूर : चीनचे विस्तारवादी आणि साम्राज्यवादी धोरण लक्षात घेता भारताच्या सुरक्षेसाठी तिबेट हा स्वतंत्र देश असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक अॅड. विमलसूर्य चिमणकर यांनी केले.
दलाई लामा यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त हिंदी मोरभवन येथे समता सैनिक दलातर्फे तिबेटच्या मुक्ती आंदोलनावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कोंडबत्तुनवार, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय निमंत्रक अशोक बोंदाडे व्यासपीठावर होते.
अॅड. चिमणकर म्हणाले, तिबेट हे एक प्राचीन बौद्ध राष्ट्र आहे. आज ते चीनच्या ताब्यात आहे. त्याच्या स्वातंत्र्यासाठी दलाई लामा यांच्या नेतृत्वात अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे.
आजही हा संघर्ष सुरू आहे. भारत हा नेहमीच तिबेटच्या बाजूने राहिला आहे. परंतु सध्या केंद्र सरकारचे धोरण मात्र कमालीचे दुटप्पीचे असल्याचे दिसून येत आहे. तिबेटची सुरक्षा ही भारतासाठी किती आवश्यक आहे, हे एकूणच भौगोलिक परिस्थितीवरून दिसून येते. अशा वेळी भारताने तिबेटचा मुद्दा बाजूला ठेवला आहे.
इतकेच नव्हे तर ज्या चीनने भारताला नेहमी धोका दिला आहे. देशावर आक्रमण केले. असे असतांनाही चीनसोबत संबंध वाढविण्यावर भर दिला जात आहे. हे एकूणच चुकीचे आहे.
प्रभाकर कोंडबत्तुनवार यांनीसुद्धा भारताच्या विदेश धोरणावर प्रहार केला. भारताची विदेश नीती ही अतिशय कमकुवत आहे. तिबेटच्या मुद्यावर भारत लाचारीने वागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अशोक बोंदाडे यांनी तिबेटमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर प्रकाश टाकला. भारताने आपल्या सुरक्षेसाठी तिबेटला मदत करणे गरजेचे आहेच. परंतु जगानेसुद्धा मानवतावादी दृष्टिकोनातून तिबेटला मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक सुनील सारीपुत्त यांनी संचालन केले. विदर्भ संघटक राहुल वासनिक यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)