सहा हजारावर पूरग्रस्तांना खावटी वाटप
By Admin | Updated: August 23, 2015 03:12 IST2015-08-23T03:12:01+5:302015-08-23T03:12:01+5:30
शासनाने आपद्ग्रस्तसाठी मंजूर केलेल्या खावटी वाटपास शासनाने तत्परता दाखवित सुरुवात केली आहे.

सहा हजारावर पूरग्रस्तांना खावटी वाटप
खावटी वाटपास सुरुवात :
आतापर्यंत ५.३ कोटी रुपयाचे वाटप
नागपूर : शासनाने आपद्ग्रस्तसाठी मंजूर केलेल्या खावटी वाटपास शासनाने तत्परता दाखवित सुरुवात केली आहे. आतापर्यंत ६ हजार ३४२ कुटुंबीयांना ५ कोटी ३ लाख रुपयांची खावटी वाटप करण्यात आली आहे.
गेल्या १३ आॅगस्ट रोजी नागपूर शहर व जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यात मोठ्या प्रमाणावर जनतेचे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी नुकसानाचा सर्वे तातडीने करण्याचा निर्देश देत आपाद्ग्रस्तांसाठी खावटी मंजूर केली होती. त्यानुसार प्रशासनातर्फे पंचनामे तयार करून खावटी वाटपास सुरुवात करण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्यात एकूण १९ हजार ९४३ कुटुंबीयांना (१ लाख ३० हजार ६१२ व्यक्ती) १४ कोटी ८४ लाख रुपयांची मंजूर खावटीची रक्कम वाटप करावयाची आहे. यामध्ये नागपूर शहरातील सर्वाधिक १५,८९६ कुटुंबीयांना ११ कोटी ९१ लाख रुपये, कामठी येथील १३९६ कुटुंबाला ७०.३४ लाख रुपये, पारशिवनी येथील ९८६ कुटुंबाला ७५.०१ लाख रुपये, नागपूर ग्रामीणमधील ६२४ कुटुंबाला ४४.९८ लाख रुपये, सावनेर तालुक्यातील ६८० कुटुंबाला ५०.७३ लाख रुपये, कळमेश्वर तालुक्यातील २३३ कुटुंबाला १४.३९ लाख रुपये, मौदा येथील ४४ कुटुंबाला ३०.५८ लाख रुपये, उमरेड तालुक्यातील ६९ कुटुंबाला ०६.०१ लाख रुपये, रामटेक तालुक्यातील १५ कुटुंबाला १ लाख ३ हजार रुपये खावटी वाटप करावयाची आहे.
यापैकी ६३४२ कुटुंबाला ५ कोटी ३ लाख रुपयांची खावटी आतापर्यंत वाटप करण्यात आली आहे. उर्वरित कुटुंबांना पुढील आठवड्यापर्यंत खावटीची रक्कम वितरित केली जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)