कामठी तालुक्यात बहरलेली फुलशेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST2021-02-06T04:15:36+5:302021-02-06T04:15:36+5:30
कामठी : लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्याने बाजारपेठेत फुलांची मागणी वाढली आहे. त्यामुळे कामठी तालुक्यातील पवनगाव, धारगाव, लिहीगाव परिसरातील शेतकऱ्यांनी ...

कामठी तालुक्यात बहरलेली फुलशेती
कामठी : लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्याने बाजारपेठेत फुलांची मागणी वाढली आहे. त्यामुळे कामठी तालुक्यातील पवनगाव, धारगाव, लिहीगाव परिसरातील शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पन्नांच्या अपेक्षेने फुलशेतीकडे मोर्चा वळविला आहे.
गतवर्षी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे बाजारपेठा बंद झाल्या. लग्नसमारंभ, मंदिर, उत्सव सणावर विरजन पडल्याने फुलांची मागणी कमी झाली. यामुळे शेतकऱ्यांनी शेतात ट्रॅक्टर फिरवून फुलशेती मोडली होती. यंदा कामठी तालुक्यातील ३७३ हेक्टरमध्ये फुलशेतीचे उद्दिष्ट आहे. पवनगाव, धारगाव, लिहीगाव, शिरपूर, तरोडी परिसरातील शेतकऱ्यांनी पालेभाज्या, भुईमूग, मूग, उडीद पिकाकडे पाठ फिरवून फुलांपासून चांगले उत्पादन होईल या हेतूने गेंदा, शेवंती, डीजी, मोगरा, गुलाब, लीली विविध फूल प्रकाराच्या शेतीचे नियोजन केले आहे. सध्या गेंदा, शेवंती, गुलाब या फुलांना बाजारपेठेत चांगले भाव मिळत असल्याचे पवनगाव येथील घनश्याम गेडाम यांनी सांगितले. त्यांनी चार एकर शेतामध्ये शेवंती, गेंदा या फुलशेतीची लागवड केली आहे. सोबतच पवनगाव, घारगाव परिसराला नागपूर येथील फूल मार्केटजवळ असल्यामुळे दररोजच शेतातील फुले तोडून मार्केटमध्ये पोहोचविण्यात येत असतात. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामात फुलशेतीतून चांगले उत्पन्न मिळण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांचा कल याकडे आहे. लॉकडाऊनमुळे गतवर्षी झालेले फुलशेतीचे नुकसान यंदा भरून निघेल, असे लिहिगाव येथील शेतकरी गणेश झोड व नेरी येथील डुमदेव नाटकर यांनी सांगितले.