अगोदर केंद्रात मंत्रिपद; नंतरच राज्याचा विचार

By Admin | Updated: June 5, 2016 02:46 IST2016-06-05T02:46:01+5:302016-06-05T02:46:01+5:30

निवडणुकीपूर्वी भाजपशी झालेल्या करारानुसार खा. रामदास आठवले यांना अगोदर केंद्रात मंत्रिपद देण्यात यावे.

First Minister at the Center; Only after the idea of ​​the state | अगोदर केंद्रात मंत्रिपद; नंतरच राज्याचा विचार

अगोदर केंद्रात मंत्रिपद; नंतरच राज्याचा विचार

मुख्यमंत्र्यांना भेटणार रिपाइंचे शिष्टमंडळ : प्रदेशाध्यक्ष थूलकर यांची माहिती
नागपूर : निवडणुकीपूर्वी भाजपशी झालेल्या करारानुसार खा. रामदास आठवले यांना अगोदर केंद्रात मंत्रिपद देण्यात यावे. त्यानंतर राज्यातील इतर पदांचा विचार केला जाईल. यासंदर्भात विदर्भातील पक्षाचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईल, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपने मित्रपक्ष असलेल्या खा. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी विधान परिषदेची एक जागा देऊ केली होती. परंतु त्यासंदर्भात रिपाइंचे ज्येष्ठ नेते महातेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही जागा घेण्यास नकार दिला. यावरून पक्षात गैरसमज निर्माण झाला. ही जागा भूपेश थूलकर यांना मिळणार असल्याने त्यांचा पत्ता साफ करण्यासाठीच ही जागा नाकारण्यात आल्याचे काही कार्यकर्त्यांना विशेषत: विदर्भातील कार्यकर्त्यांना वाटू लागले. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. यातच थुलकर यांनी शनिवारी नागपुरात विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यामुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर तर नाही ना, असा संशय व्यक्त केला गेला. परंतु हा केवळ संशयच राहिला.
रविभवन येथे रिपाइं (आ) च्या विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी पार पडली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना भूपेश थुलकर यांनी पक्षात कुठलीही फाटाफूट नसल्याचे स्पष्ट केले. खा. रामदास आठवले यांचा निर्णय आमच्यासाठी सर्वतोपरी आहे.
खा. आठवले यांना मंत्रिपद मिळत नाही, तोपर्यंत राज्यात आम्ही कुठलेही पद घेणार नाही, ही पक्षाची भूमिका आहे. ती सर्वांनाच मान्य आहे. महातेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. तेव्हा खा. आठवले हे देशाबाहेर होते तर मी (प्रदेशाध्यक्ष) पुण्यात होतो. आम्ही दोघेही नसल्याने पक्षाची ती अधिकृत भूमिका आहे की नाही, असे कार्यकर्त्यांना वाटले. त्यामुळे संशय निर्माण झाला होता. परंतु खा. आठवले यांच्याशी बोलूनच महातेकर यांनी जाहीर केल्याचे नंतर स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत विदर्भ अध्यक्ष भीमराव बन्सोड, विदर्भ संघटक राजन वाघमारे, अशोक मेश्राम, आर.एस. वानखेडे, दुर्वास चौधरी, डॉ. भीमराव मस्के, मनोज मेश्राम, भीमराव कांबळे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

१ जुलैपासून विदर्भ जनजागृती अभियान
रिपाइंचे संस्थापक सदस्य बाबू हरिदास आवळे यांच्या जयंती शताब्दी वर्षानिमित्त येत्या १ जुलैपासून विदर्भ जनजागृती अभियान सुरू करण्यात येणार आहे. यात विदर्भ यात्रा काढणे, जनजागृती करणे आदींंच्या माध्यमातून स्वतंत्र विदर्भासाठी पक्षातर्फे मोठे आंदोलन उभे करण्यात येईल, असेही शनिवारच्या बैठकीत ठरल्याचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी सांगितले.
प्रभाग पद्धतीच्या विरोधात न्यायालयात जाणार
चार सदस्यांचा एक प्रभाग ही पद्धती छोट्या पक्षांसाठी तसेच विकासासाठी घातक आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात पक्षातर्फे याचिका दाखल करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईचे प्रसिद्ध वकील बी.के. बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच न्यायालयात जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांच्याशी समन्वय साधून याचा विरोध केला जाईल, असेही बैठकीत ठरल्याचे थुलकर यांनी सांगितले.

Web Title: First Minister at the Center; Only after the idea of ​​the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.