फाईल्समध्ये अडकला गांधीसागरचा विकास
By Admin | Updated: August 27, 2016 02:12 IST2016-08-27T02:12:04+5:302016-08-27T02:12:04+5:30
ऐतिहासिक गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण केले जाईल, असे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सांगितले जाते.

फाईल्समध्ये अडकला गांधीसागरचा विकास
३२.४ कोटींचा नवा बृहत् आराखडा तयार : आता डीपीआरसाठी पीएमसी नियुक्त होणार
नागपूर : ऐतिहासिक गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण केले जाईल, असे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सांगितले जाते. कधी तलावाचे पुनरुज्जीवन तर कधी सौंदर्यीकरण करा, असे आदेशही दिले जातात. मात्र, आजवर महापालिका प्रशासनातर्फे विकासाच्या किंवा सौंदर्यीकरणाच्या एकाही प्रस्तावावर काम झाले नाही. यासाठी कधी निधीही देण्यात आलेला नाही.
अहमदाबादच्या कंपनीतर्फे दोन वर्षांपूर्वी तयार केलेला बृहत् आराखडा मंजूर करून नवा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नियुक्त करण्याची तयारी करण्यात आली आहे. आगामी स्थायी समितीच्या बैठकीत याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सन २०१२-१३ मध्ये अर्थसंकल्पात बीओटी तत्त्वावर गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण, विकास, बोटिंग, वॉटर स्पोर्टस् आदी करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या प्रस्तावाची अंमलबजावणी झाली नाही. २८ आॅक्टोबर २०१४ रोजी महापालिका आयुक्त तसेच १२ नोव्हेंबर २०१४ रोजी महापौर यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून तलावाची भिंत व येथील भाऊसाहेब पागे उद्यानाच्या पुनर्निर्माणसाठी २१.३४ कोटी रुपये देण्याची मागणी केली होती. महापालिकेने स्वत:चा निधी खर्च करून काही विकास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हेरिटेज समितीच्या आक्षेपानंतर प्रस्ताव रखडला.
दरम्यान, गांधीसागर तलावाचा अहमदाबादच्या काकरिया तलावाच्या धर्तीवर विकास करण्याची योजना आखण्यात आली. स्थायी समितीने २४ जुलै २०१५ रोजी मे. एचसीपी डिझाइन, प्लानिंग अॅण्ड मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड, अहमदाबाद यांना कन्सेप्ट मास्टर प्लान तयार करण्याचे काम दिले.
कंपनीने प्राथमिक सर्वेक्षण, विकास प्रारूप, टोपोग्राफी मॅन, एरियल फोटोग्राफ, महापालिकेच्या विविध विभागांशी समन्वय बैठक घेऊन तसेच पर्यावरण व हेरिटेज समितीने आखून दिलेल्या कक्षेत राहून नवा बृहत् आराखडा तयार केला. तलावाच्या १०० मीटर परिसरात सुमारे २०१.३ हेक्टर परिसरला एकत्रित करून विकसित करण्याचे प्रारूप तयार करण्यात आले. हा आराखडा तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. यानंतर मात्र प्रस्ताव थंडबस्त्यात पडला. (प्रतिनिधी)
कंपनीचे उत्तर मिळाले नाही
७ मे २०१६ रोजी महापालिकेचे मुख्य अभियंता यांनी अहमदाबाद येथील कंपनीला आराखड्यामध्ये खासगी जमिनीवर बांधकाम करणे, पार्किंग, आर्थिक बाबी तसेच प्रकल्पाचा विकास पीपीपी किंवा बीओटीवर करण्याबाबत स्पष्टीकरण मागितले. मात्र, संबंधित कंपनीने आजवर स्पष्टीकरण दिले नाही. अशात आता महापालिकेने नव्याने बृहत् आराखड्याच्या आधारावर नवा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटन्ट (पीएमसी) नियुक्ती करण्याची तयारी केली आहे. तेव्हा आता असा प्रश्न निर्माण होत आहे की, गांधीसागर तलावाचा विकास व सौंदर्यीकरणाच्या नावावर कितीदा आराखडा तयार केला जाईल व पैशाचा अपव्यय केला जाईल. महापालिकेने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव वेगवेगळा
महापालिकेच्या नदी- तलाव विभागाचे प्रमुख मो. इसराईल यांनी सांगितले की, बृहत् आराखडा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत तलाव परिसराचे सौंदर्यीकरण करायचे आहे. पुनरुज्जीवनाचा दुसरा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. यापूर्वी दोन कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. आता तो वाढवून पाच कोटींचा करण्यास सांगितले आहे. बृहत् आराखडा तयार करण्यावर किती खर्च झाला याची माहिती आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले.