यापुढे ‘फास्टटॅग’ला मुदतवाढ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST2021-02-15T04:08:02+5:302021-02-15T04:08:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : टोल नाक्यांवर आवश्यक असलेल्या फास्ट टॅगप्रणालीला याअगोदर दोन ते तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. ...

यापुढे ‘फास्टटॅग’ला मुदतवाढ नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टोल नाक्यांवर आवश्यक असलेल्या फास्ट टॅगप्रणालीला याअगोदर दोन ते तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. देशातील बहुतांश महामार्गांवर हा प्रयोग ८० ते ९० टक्के यशस्वी झाला आहे. जे लोक ‘फास्ट टॅग’प्रणालीत आलेले नाहीत, त्यांनी तात्काळ पावले उचलावीत, कारण आता कुठल्याही स्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी स्पष्ट केले. नागपुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
‘फास्ट टॅग’प्रणाली ही वाहतूकदारांच्या सोयीसाठीच लागू करण्यात आली आहे. टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नयेत व त्रास होऊ नये यासाठी ही प्रणाली उपयोगाची आहे. १० टक्के लोकांनी अद्यापही ‘फास्ट टॅग’ घेतलेले नाहीत. टोलनाक्यांवरदेखील फास्ट टॅग विक्रीची व्यवस्था आहे. जर फास्ट टॅग घेतले नाही तर यापुढे अशा लोकांना त्रास होईल, असे गडकरी म्हणाले.
पेट्रोल, डिझेलवर होणाऱ्या खर्चात बचतीसाठी ‘सीएनजी’वरील वाहने चालविण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत ‘सीएनजी’मुळे मोठी बचत होते. विशेषत: ट्रॅक्टर ‘सीएनजी’वर चालविला तर वर्षाला शेतकऱ्यांचे दीड लाख रुपये तर सहज वाचतील, असे गडकरी म्हणाले.
पूर्व विदर्भातील वाहने ‘सीएनजी’वर आणणार
पुढील पाच वर्षांत गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियासह पूर्व विदर्भातील सर्व सहाही जिल्ह्यातील वाहने ‘सीएनजी’वर चालविण्यावर भर देण्यात येईल. नागपुरात यादृष्टीने कामदेखील सुरू झाले आहे. विशेषत: ट्रॅक्टर, शहर बस, परिवहन महामंडळाच्या बसेस व ऑटोरिक्षा सीएनजीवर चालविण्यात येतील. त्यामुळे लोकांची इंधनावरील खर्चात बचतदेखील होईल व प्रदूषणदेखील कमी होईल. उपराजधानीतील महापौर, नगरसेवक, अधिकाऱ्यांची वाहनेदेखील ‘सीएनजी’वर चालतील, असे गडकरी यांनी सांगितले.