ट्रान्सफार्मर बिघडल्याने शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST2021-06-20T04:07:40+5:302021-06-20T04:07:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पावसाळा सुरू झाला असला तरी पाऊस कधी दडी मारेल आणि पिके पाण्याअभावी कधी कोमेजतील ...

ट्रान्सफार्मर बिघडल्याने शेतकरी अडचणीत
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : पावसाळा सुरू झाला असला तरी पाऊस कधी दडी मारेल आणि पिके पाण्याअभावी कधी कोमेजतील याचा भरवसा नाही. अशावेळी पिके वाचविण्यासाठी विहीर व इलेक्ट्रिक माेटरपंप शेतकऱ्यांच्या कामी येते. मात्र, बाेरडा (ता. रामटेक) शिवारातील विजेचे ट्रान्सफार्मर काही महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी वारंवार केली. परंतु, महावितरण कंपनीचेे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.
बाेरडा येथील काही शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली असून, काहींनी राेवणी करण्यासाठी पऱ्हे टाकले आहे. पऱ्हे टाकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. खरं तर इतर पिकांच्या तुलनेत धानाच्या पिकाला सर्वाधिक पाण्याची गरज असते. पऱ्ह्यातील धानाची राेपटी जगवण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. या शिवारातील विजेचे ट्रान्सफार्मर बिघडल्याने शेतकऱ्यांना पावसावर अवलंंबून राहावे लागत आहे. पावसाने तीन-चार दिवस दडी मारल्यास पऱ्ह्यातील राेपटी सुकायला सुरुवात हाेते. अशावेळी शेतकरी विहिरीतील पाण्याचा वापर करतात.
देवरी-बाेरडा शिवारातील ट्रान्सफार्मवर बाेरडा शिवारातील ५० शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी वीजपुरवठा दिला आहे. ट्रान्सफार्मरमध्ये पाच महिन्यापूर्वी बिघाड निर्माण झाल्याने विहिरीत पाणी असूनही शेतकऱ्यांना ओलित करणे शक्य हाेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मरची दुरुस्ती करण्याची वारंवार मागणी केली. परंतु, महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या मागणीकडे अद्यापही लक्ष दिले नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. ही समस्या तातडीने साेडविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
...
बिलांची वसुली आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष
या भागातील विजेच्या बहुतांश तारा लाेंबकळलेल्या आहेत. त्या तारांचे आपसात घर्षण हाेत असल्याने शाॅर्ट सर्किट हाेऊन वीजपुरवठा खंडित हाेताे. प्रसंगी स्पार्किंगमुळे तारा तुटतात व धाेका उद्भवताे. बहुतांश शेतकऱ्यांनी पदरमाेड करून खासगी व्यक्तीकडून ही दुरुस्तीची कामे काही प्रमाणात केली. महावितरण कंपनी शेतकऱ्यांकडून विजेच्या अवाजवी बिलाची नियमित वसुली करते. मात्र, दुरुस्तीकडे दुर्लक्ष करते, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे.