शेतकरी संकटात, अधिकारी हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:07 IST2021-07-20T04:07:54+5:302021-07-20T04:07:54+5:30
रामटेक : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले, पण तालुक्यात अद्यापही दमदार पावसाची नोंद नाही. केवळ एकदाच ६५ मिमी ...

शेतकरी संकटात, अधिकारी हतबल
रामटेक : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले, पण तालुक्यात अद्यापही दमदार पावसाची नोंद नाही. केवळ एकदाच ६५ मिमी पाऊस झाला. तेव्हापासून पावसाने पाठ फिरविली. रात्री ओस पडत आहे. दिवसा ऊन पडणे सुरू आहे. दमट हवामानाने नागरिक त्रस्त आहेत. एकीकडे नैसर्गिक संकट आहे, तर दुसरीकडे वीजपुरवठा करायला वितरण विभागही असमर्थ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. तालुक्यात एकदाच दमदार पाऊस झाला. त्यामुळे धानाची रोवणी करायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली. रोवणीसाठी पाणी भरपूर लागते, पण सध्या पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे धानाच्या रोवणी काही ठिकाणी खोळंबल्या आहेत. ज्यांच्या रोवणी झाल्या आहेत, त्या जगवायचे कशा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांकडे विद्युत पंप आहे, पण तीन फेज लाइन बंद असल्याने पंप चालू शकत नाही. वितरण विभागाने तीन फेज लाइन द्यावी, आम्ही वीजबिल भरायला तयार आहोत, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. यास वीज वितरण विभागाचे उपअभियंता हतबलता दाखवित आहे. शेतकऱ्यांनी उपअभियंता रामटेक यांची भेट घेऊन निवेदन दिले, पण अधिकारी वितरण विभागाकडे डीपी दुरुस्त करण्यासाठी पैसे नाही. अगोदर बिल भरा, तरच काही करता येईल, असे सांगतात. शेतकऱ्यांचे कर्ज शासनाने माफ केले आहे. मग शेतकरी बिल का भरत नाही, असा सवाल अधिकारी करतात. शेतकऱ्यांनी मात्र बिल रीडिंगनुसार देण्यात येत नसल्याचा आरोप केला आहे. सध्या वितरण विभागाने सिंगल फेज सुरू ठेवला आहे. त्यामुळे सिंचन करणे शक्य नाही. खुमारी परिसरात डीपीतून सिंगल फेज लाईन सुरु आहे. धानाच्या रोवणी सुरु आहे. पण पावसाने पाठ फिरविल्याने रोवणी थांबविण्याचे संकट निर्माण झाले आहे.