पुनर्मिलन दाम्पत्यांना आता कौटुंबिक न्यायालयाचे प्रमाणपत्र
By Admin | Updated: August 22, 2016 02:55 IST2016-08-22T02:55:48+5:302016-08-22T02:55:48+5:30
घटस्फोटाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन समुपदेशनातून पुनर्मिलन होणाऱ्या दाम्पत्यांना कौटुंबिक न्यायालयाने ‘नांदा सौख्य भरे’, ...

पुनर्मिलन दाम्पत्यांना आता कौटुंबिक न्यायालयाचे प्रमाणपत्र
नागपूर : घटस्फोटाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन समुपदेशनातून पुनर्मिलन होणाऱ्या दाम्पत्यांना कौटुंबिक न्यायालयाने ‘नांदा सौख्य भरे’, असा आशय असलेले प्रमाणपत्र बहाल करणे सुरू केले आहे.
विवाह समुपदेशकाच्या माध्यमातून ज्या दाम्पत्याने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या या सकारात्मक निर्णयाचा वैवाहिक बळकटीकरणासाठी फायदा होण्याच्या दृष्टीने या अभिनव उपक्रमास कौटुंबिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय वकील संघ आणि मध्यस्थी केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात करण्यात आली आहे. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत अग्निहोत्री यांच्या न्यायालयात दाखल प्रकरणात शनिवारी एका दाम्पत्याने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मानकापूर भागात राहणाऱ्या सुजितने आपली पत्नी स्वप्ना हिच्या विरुद्ध घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. या दोघांचे लग्न ९ एप्रिल २०१४ रोजी झाले होते. त्यांना एक मूलही आहे. अचानक पतीने घेतलेल्या निर्णयाने पत्नीला धक्का बसला होता. मुलाचा सांभाळ कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला होता. अचानक विवाह समुपदेशक या दोघांच्या पुनर्मिलनासाठी धावून आले. त्यांचे मन परिवर्तन करण्यात त्यांना यश आले. आज या दोघांना नांदा सौख्य भरे, असा उपदेश असलेले प्रमाणपत्र कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश ई. एम. बोहरी आणि प्रशांत अग्निहोत्री यांनी बहाल केले.(प्रतिनिधी)