लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेकडो कोटींच्या फसवणुकीचे रॅकेट चालविणारे सूत्रधार बंटी साहू आणि त्याचा भाऊ जयेश साहू यांनी विदर्भ आणि शेजारच्या राज्यांच्या बनावट कंपन्या उघडल्या होत्या. चौकशीतून या रॅकेटचे धागेदोरे मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्येदेखील असल्याची बाब समोर आली आहे.
या घोटाळ्यात आतापर्यंत संतोष ऊर्फ बंटी शाहू, त्याचा भाऊ जयेश शाहू, ब्रिज किशोर मणियार, ऋषी लखानी आणि आनंद हरडे यांना अटक करण्यात आली आहे. तीन आरोपी फरार आहेत. आरोपींपैकी एक अंशुल मिश्रा याच्याविरुद्ध लुकआउट सर्क्युलरदेखील जारी करण्यात आओ आहे. तो मणियारचा विश्वासू साथीदार आहे. पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात बंटी हा या रॅकेटमागील सूत्रधार असल्याचे आढळून आले आहे. त्याने बनावट कंपन्यांची विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी बनावट नागरिकांच्या नावाने बनावट पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनवले. या कागदपत्रांच्या आधारे बनावट कंपन्या सुरू करण्यात आल्या. अनेक शहरांमध्ये पत्ते नोंदवून बनावट कंपन्यांमधील अंतर दाखवण्याचा बंटीचा हेतू होता.
- पोलिसांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये छापे टाकून लोकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
- यात मध्यप्रदेश व छत्तीसगडमधील कंपन्यांचादेखील समावेश आहे. या रॅकेटअंतर्गत चालणारी कंपनी क्षितीज एंटरप्रायझेसने ११३ बनावट कंपन्यांना बनावट बिले दिली आहेत तर अवध एंटरप्रायझेसने अशा ५७ कंपन्यांना बनावट बिले दिली आहेत.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी विभागाकडून बंटीच्या रॅकेटकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.
- महिनाभरापूर्वी, त्याचा भाऊ जयेशच्या नवधारा फर्मवर जीएसटी अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक उघडकीस आली.
- मात्र या फसवणुकीकडे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुर्लक्ष केले. पोलिसांच्या कारवाईनंतर हा उच्चपदस्थ अधिकारी खूपच सक्रिय झाला आहे