लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक दिवसानंतर गेल्या सोमवारपासून शहरातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहिली. ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळाल्याने शहरातील सर्वच बाजारपेठेत उत्साह दिसून आला. त्यामुळे व्यापारीही आनंदात होते. एकूणच चित्र पाहता येत्या काही दिवसात लाॅकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई निघेल, असा विश्वास व्यापाऱ्यांना वाटू लागला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपुरात मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात संक्रमण अनियंत्रित झाले होते. परंतु आता परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने हळूहळू निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याअंतर्गत स्थानिक प्रशासनाने रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली. त्यामुळे सोमवारपासून बाजारपेठेतील उत्साह पुन्हा वाढल्याचे दिसून आले. गेल्या तीन दिवसात हॉटेल असो की शोरुम सर्वच ठिकाणी गर्दी झाली. दरम्यान, बहुतांश व्यापारी व ग्राहकांनी मास्क, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझर आदी नियमांचे पालन केले.
बॉक्स
व्यापाऱ्यांसााठी पॅकेजची मागणी
दरम्यान, चेंबर ऑफ असाेसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड(कैमिट)चे अध्यक्ष दीपेन अग्रवाल आणि नाग विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत करीत, आता राज्य सरकारने व्यापाऱ्यांसाठी तातडीने पॅकेजची घोषणा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
---------------------------
युवकांत संचारला उत्साह
कोविन अॅपवर एका दिवशी ४५ हजारांहून अधिक नोंदणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी बुधवारी ४२ हजार नागरिकांचे विक्रमी लसीकरण करण्यात आले. दुसरीकडे कोविन अॅपवर एकाच दिवशी तब्बल ४५ हजारांहून अधिक युवकांनी नोंदणी केली. गुरुवारीही कोविन अॅपवर असाच प्रतिसाद कायम होता. लसीकरणाची युवकांना प्रतीक्षा होती. २३ जून पासून १८ वर्षावरील लसीकरण सुरू होताच युवकांत प्रचंड उत्साह संचारला. कोरोनापासून बचावासाठीचा एकमेव रामबाण उपाय म्हणजे प्रतिबंधात्मक लसीकरण. या लसीकरणाला आता जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
सुरुवातीला लसीकरणापासून गैरसमजातून अलिप्त राहणाऱ्या नागरिकांनी दुसऱ्या लाटेत आपल्या जवळच्या आप्तस्वकीयांना कोरोनाबाधित होऊन मृत्युमुखी पडताना बघितले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे लसीकरण करणे, हे ग्रामीण भागातही कळून चुकले असून ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणासाठी पुढे येत आहे. विशेषत: आज तरुण मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रावर पोहोचल्याचे दिसून आले.
नागपूर महानगरपालिका, नागपूर
नागपुरात लसीकरणाची अद्ययावत स्थिती
पहिला डोज :-
आरोग्य सेवक- ४६,११८
फ्रंट लाईन वर्कर- ५३,२६५
१८ वयोगट- ३६,८२६
३० ते ४४ वयोगट-३४,९५७
४५ वयोगट- १,४४,९८३
४५ कोमार्बिड - ८५,२८३
६० सर्व नागरिक-१,८१,८९१
पहिला डोज - एकूण : - ५,८३,३२३
दूसरा डोज :-
आरोग्य सेवक- २४,७५३
फ्रंट लाईन वर्कर- २१,४८२
१८ वयोगट- ७,३७८
४५ वयोगट- ३४,८३०
४५ कोमार्बिड - २०,२९३
६० सर्व नागरिक- ८३,५१९
दूसरा डोज - एकूण -१,९२,२५५
संपूर्ण लसीकरण एकूण : - ७,७५,५७८
-------------------------------------------
मेट्रोचे प्रवासी वाढले
- कोविड नियमांचे कटाक्षाने पालन : स्टेशनची वारंवार स्वच्छता
नागपूर : महा मेट्रोने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गाडी आणि स्थानकांवर घेतलेल्या कोविड सुरक्षा उपायांमुळे नागपूरकरांचा विश्वास पुन्हा एकदा कायम झाला आहे. त्यामुळे मेट्रोची राईडशिप वाढली आहे. २० जून रोजी ऑरेंज आणि अॅक्वा लाईन्सचा एकत्रित प्रवासी आकडा १३ हजारांवर गेला आहे.
लॉकडाऊन कालावधीच्या आकडेवारीच्या तुलनेत ही वाढ मोठी आहे. ५ जून रोजी ७६१ लोकांनी मेट्रोचा वापर केला होता. अनलॉक झाल्यावर पहिल्या दिवशी ७ जूनला आकडेवारी ४१५३ वर गेली. तर १३ जूनला ९५०० वर पोहोचली.
लॉकडाऊनदरम्यान दोन्ही मार्गावरील गाड्यांच्या फेऱ्या एक तास अवधीने होत्या. ७ जूनपासून ते ३० मिनिटांच्या अवधीपर्यंत वाढविण्यात आल्या. सध्या अॅक्वा लाईनवर (सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर) सकाळी ६.३० ते सायंकाळी ८ दरम्यान आणि ऑरेंज लाईनवर (सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी) सकाळी ८ सायंकाळी ८ पर्यंत गाड्या धावतात.
मेट्रो सेवा सुरू होण्यापूर्वी सर्व गाड्या व स्थानकांची स्वच्छता करण्यात आली. दिवसभर नियमित अंतराने निर्जंतुकीकरण करण्यात येते. गाड्या व स्थानकांवर अधिक स्पर्श होणाऱ्या भागांची वारंवार स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जाते. कर्मचाऱ्यांनी देऊ केलेल्या चलनी नोटा अल्ट्रा-व्हॉयलेट किरणांचा वापर करून निर्जंतुक करण्यात येतात आणि त्या स्वतंत्रपणे ठेवून प्रवाशांना देण्यासाठी उपयोग केला जातो. विविध प्राधिकरणाद्वारे जारी केलेल्या सुरक्षेसंबंधी सूचना नियमितपणे प्रवाशांपर्यंत फलकांद्वारे आणि कर्मचाऱ्यांद्वारे पोहोचविण्यात येतात. कोविडची जनजागृती स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये सार्वजनिक घोषणा सिस्टीमवर नियमित घोषणा केल्या जातात. प्रवाशांच्या माहितीसाठी मेट्रो स्थानकांवर स्टँड आणि माहिती बोर्ड लावण्यात आलेले आहेत.
तारीख रायडरशिप
५ जून ७६१
७ जून ४,१५३
१३ जून ९,५००
१९ जून ८,६४७
२० जून १३,५००
---------------
नागपुरात कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण केवळ ६५८
४६२ होम हायसोलेशनमध्ये :१९६ रुग्ण विविध रुग्णालयात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील कोरोना आता बऱ्यापैकी नियंत्रणात आलेला आहे. सध्याच्या घडीला नागपुरात कोरोनाचे केवळ ६५८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी ४६२ रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. तर केवळ १९२ रुग्णांवर विविध रुग्णांलयांमध्ये उपचार सुरु आहेत.
बुधवारी एकूण ४६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात शहरातील २५ आणि ग्रामीणचे २० तसेच जिल्ह्याबाहेरच्या एकाचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ४,७६,८७० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. ९०२२ रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी जिल्ह्यात ९७ कोरोना रुग्ण बरे झाले. यासोबतच आतापर्यंत एकूण ४,६७,१९० पॉझिटिव्ह बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट ९७.९६ टक्केवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासाच ९४१३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील संक्रमणाचा दरही ०.४८ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.
--------------------------------------
मृत ९०२२ झोपडपट्टीधारक झाले अखेर जमिनीचे मालक!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झोपडपट्टीवासीयांना मालकीपट्टे देण्याची घोषणा पाच वर्षापूर्वी केली होती. परंतु यासाठी झोपडपट्टीधारकांना संघर्ष करावा लागत आहे. दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील उच्चभ्रूंची मोठी वसाहत असलेल्या लक्ष्मीनगर भागात अत्यंत मोक्याच्या नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर सुमारे ४५ वर्षांपासून वसलेल्या १०५ पैकी ५५ लाभार्थींचे मालकी पट्टे आतापर्यंत दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात पंजीबद्ध झाले असून इतरांच्या दस्त नोंदणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
लक्ष्मीनगर झोपडपट्टीवासीयांनी मालकीपट्ट्यांसाठी शहर विकास मंचच्या नेतृत्त्वात लढा उभारला होता. अडथळे पार करून या लढ्याला यश आले. येथील झोपडीधारक त्यांच्या घराच्या जमिनीचे मालक झाले आहेत. येथील ९५ टक्के घरे पक्की आहेत. मौजा अजनीच्या खसरा क्र. ३ वरील सव्वा एकर (०.४९८ हेक्टर) एवढ्या क्षेत्रावर सुव्यवस्थित पद्धतीने वसलेली ही झोपडपट्टी चारही बाजूंनी बंगले आणि फ्लॅट स्किमनी वेढलेली आहे आणि या मुळेच या झोपडपट्टीवर अनेकांची वक्रदृष्टी होती.
या झोपडपट्टीला १३ जुलै १९८९ रोजी महाराष्ट्र सरकारने अधिकृत घोषित केले, परंतु, झोपडपट्टीवासीयांवर नेहमी निष्कासनाची टांगती तलवार होती. त्यामुळे वस्तीतील नागरिकांनी स्थानिक कार्यकर्ते रामदास उईके यांच्या पुढाकाराने लक्ष्मीनगर झोपडपट्टी सुधार समितीची स्थापना करून शहर विकास मंचच्या नेतृत्त्वात २००४ पासून मालकी पट्ट्यांसाठी संघर्ष सुरू केला. मंचचे संयोजक अनिल वासनिक व इतर पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. लीना बुद्धे यांची साथ मिळाली.
महाराष्ट्र सरकारने १६ जुलै २०१६ व २४ ऑगस्ट २०१६ रोजी दोन शासनादेश काढून नागपुरातील झोपडपट्टीघारकांना मालकी पट्टे देण्याचे धोरण जाहीर केले. त्यानुसार नासुप्रने पट्टे वाटपासाठी पहिल्या टप्प्यात निर्धारित केलेल्या ५२ वस्त्यांमध्ये लक्ष्मीनगर झोपडपट्टीचाही समावेश होता. परंतु, ही जागा शाळेसाठी आरक्षित असल्याने पट्टे वाटपात अडथळा निर्माण झाला होता.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये या झोपडपट्टीच्या जागेवरील आरक्षण रद्द व जमीन वापर बदलवून जमिनीचा रहिवासी प्रयोजनार्थ फेरबदल करावा, यासाठी मंचच्या पदाधिकाऱ्यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला. अखेर नासुप्रच्या पत्रानुसार मनपा सभागृहात मंजुरी देण्यात आली.
----------------------------------------------------