योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंत्री नितेश राणे यांनी व्हर्चुअल ईदसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे. या मुद्द्यावर भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सावध प्रतिक्रिया दिली. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्म-पंथाच्या परंपरा व रितीरिवाजांप्रमाणे सण साजरे करण्याचे स्वातंत्र्य आहे हीच भाजपची भूमिका असल्याचे प्रतिपादन चव्हाण यांनी केले. नागपुरात भाजपच्या विदर्भ विभागीय कार्यशाळेनंतर आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलीन होत असल्याचा दावा अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केला. त्याबाबत चव्हाण यांना विचारणा केली असता त्यांनी ठोस उत्तर देण्याचे टाळले. तसेच राणे यांच्याविरोधात कारवाई करण्याबाबतदेखील त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, विदर्भ विभागीय कार्यशाळेबाबत त्यांना माहिती दिली. भाजपकडून देशभरात संघटन पर्वाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याचा आता अंतिम टप्पा आहे. राज्यातील ८० संघटनात्मक जिल्ह्यात नेमणूका झालेल्या आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या योजना तसेच केलेली महत्त्वाची कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते काम करणार आहेत. पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने एक झाड मातृभूमीच्या नावाने लावण्याचे जनतेला आवाहन करण्यात येणार आहे. तसेच कॉंग्रेसने लावलेल्या आणीबाणीविरोधात २५ जून रोजी काळा दिवस पाळण्यात येणार आहे. कॉंग्रेसने लोकशाहीची हत्या केली होती व त्याची आठवण जनतेला या माध्यमातून करून देण्यात येईल. केंद्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी त्यांची भूमिका मांडल्यावर राज्य तसेच जिल्हा पातळीवर कार्यक्रम घेण्यात येतील, असे चव्हाण यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या माध्यमातून जनसंपर्क२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. या माध्यमातून भाजपकडून जनसंपर्क राबविण्यात येईल. प्रत्येक मंडळात दोन कार्यक्रम आयोजित करून व्याख्याने व इतर उपक्रम घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.