प्रत्येक घरात जिजाऊ झाली पाहिजे
By Admin | Updated: June 17, 2014 00:54 IST2014-06-17T00:54:33+5:302014-06-17T00:54:33+5:30
आधुनिकतेच्या हव्यासात आम्ही पुन्हा इंग्रजीच्याच विळख्यात अडकलो आहोत. याची आपल्याला जाणीव आता व्हायला हवी. आपला धर्म, आपले राष्ट्र, आपला समाज आणि आपले कुटुंब शाबूत ठेवायचे असेल

प्रत्येक घरात जिजाऊ झाली पाहिजे
अपर्णा रामतीर्थकर : जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार समारंभ
नागपूर : आधुनिकतेच्या हव्यासात आम्ही पुन्हा इंग्रजीच्याच विळख्यात अडकलो आहोत. याची आपल्याला जाणीव आता व्हायला हवी. आपला धर्म, आपले राष्ट्र, आपला समाज आणि आपले कुटुंब शाबूत ठेवायचे असेल तर प्रत्येक घरात जिजाऊसारखी आई तयार झाली पाहिजे. आज ही गरज प्रकर्षाने जाणवायला लागली असल्याचे मत अपर्णा रामतीर्थकर यांनी व्यक्त केले.
छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्यावतीने जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सायंटिफिक सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी पुरस्कार स्वीकारल्यावर उत्तर देताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मेळघाटच्या सुप्रसिद्ध समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजेय देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि २१ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
रामतीर्थकर म्हणाल्या, आधुनिक जीवनशैलीतून आपली परंपरा आणि संस्कृती नष्ट होते आहे. अन्य समाज त्यांच्या कट्टरवादाचा पुरस्कार करतात तर हिंदू मात्र मवाळ भूमिका घेतात. मुलींच्या बदललेल्या पोशाखावरून ते स्पष्ट होतेच आहे. या प्रकारात आईचा पदरही हल्ली सापडत नाही. पण आईचा पदर मोलाचे काम करतो. मुले शिक्षणाच्या निमित्ताने दूर राहतात. होस्टेलमध्ये पालकांपासून दूर राहतात आणि कुटुंबापासूनही दूर करतात. पोटच्या गोळ्यांना शिक्षण मिळावे म्हणून पालक खस्ता खातात पण मुले शिक्षण घेतल्यावर पालकांनाच अडगळ समजतात. याचाही विचार करण्याची वेळ आज आली आहे. घरातील संस्कार पक्का असला तर मुले कुठेही असली तरी त्यांचे विचार परिपक्व होत जातील. हा संस्कार आई आणि वडिलांनी मिळूनच करायला हवा पण त्यातही आई महत्त्वाची आहे. त्यामुळेच जिजाऊंसारखी आई घराघरांत तयार झाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
प्रास्ताविकात अजेय देशमुख यांनी प्रतिष्ठानची माहिती दिली. नीता पांडे व त्यांच्या चमूने पोवाडा सादर केला.
मानपत्राचे वाचन प्रसन्न बारलिंगे यांनी केले. डॉ. स्मिता कोल्हे यांचे स्वागत संध्या अलकरी आणि अनिल ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शुभांगी चिंचाळकर यांनी तर आभार संजय बाराहाते व अपूर्वा मार्डिकर यांनी मानले. (प्रतिनिधी)