अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने : शिक्षण विभाग सज्ज
नागपूर : सीबीएसई दहावीचे सोमवारी निकाल जाहीर झाले; शिवाय उर्वरित निकालही आठवडाभरात लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांची अकरावीच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे; शिवाय शिक्षण विभागानेही ‘मिशन अॅडमिशन’ची तयारी सुरू केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. मात्र यंदा विज्ञान व द्विलक्षी अभ्यासक्रमासोबतच कला व वाणिज्य शाखेतही केंद्रीय पद्घतीने प्रवेश दिले जाणार आहेत. यासंबंधी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सूचनाही जारी केल्या आहेत. नागपूर शहरात सुमारे १७० कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यात अकरावी प्रवेशासाठी ३९ हजार ७८० जागा उपलब्ध आहेत. यात विज्ञान शाखेतील १७ हजार १२०, कला शाखेतील ७ हजार ३८०, वाणिज्य शाखेतील ११ हजार ५२० व द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या ३ हजार ७६० जागांचा समावेश आहे. नागपूर शहराबाहेरील व सीबीएसई शाळांमधून दहावी उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी कला शाखेकरिता एम. एम. मोहता विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, सक्करदरा, वाणिज्य शाखेसाठी डॉ. आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, दीक्षाभूमी व विज्ञान आणि द्विलक्षी अभ्यासक्रमाकरिता धनवटे नॅशनल कनिष्ठ महाविद्यालय, काँग्रेसनगर या तीन केंद्रांवरून शाखानिहाय आवेदनपत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत; शिवाय याच केंद्रावर ते स्वीकारले जातील. विद्यार्थ्यांना ‘एसएमएस’वर माहिती आतापर्यंत दरवर्षी विद्यार्थी व पालकांना अकरावीच्या प्रवेशासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. प्रवेश अर्ज खरेदीपासून तर तो केंद्रीय प्रवेश समितीकडे सादर करून, प्रवेश निश्चित होईपर्यंत विद्यार्थी व पालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. परंतु यंदा शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रवेशाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिवाय विद्यार्थ्याने ज्या शाळेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली, त्याच शाळेत त्याला अकरावी प्रवेशाचा अर्ज उपलब्ध होणार असून, तेथेच तो स्वीकारलाही जाणार आहे. यानंतर त्या विद्यार्थ्याला घरबसल्या एसएमएसच्या माध्यमातून त्याचा प्रवेश निश्चित करण्यात आलेल्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती दिली जाईल. त्यानुसार तो विद्यार्थी थेट संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेऊ शकेल. परंतु ही सुविधा केवळ कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनाच मिळणार असून, विज्ञान व द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मात्र नियमित प्रक्रियेला पुढे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी) प्रत्येकाला प्रवेश मिळणार दहावी उत्तीर्ण होणार्या प्रत्येक विद्यार्थ्याला अकरावी प्रवेश मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने पूर्ण काळजी घेतली आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जाणार असल्याने कोणावरही अन्याय होणार नाही; शिवाय कुणीही प्रवेशापासून वंचित राहणार नाही. शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेशासाठी संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. आता केवळ दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. ते निकाल जाहीर होताच, प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाईल. आतापर्यंत केंद्रीय प्रवेश पद्घतीच्या माध्यमातून केवळ विज्ञान व द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जात होता. परंतु यंदा प्रथमच कला व वाणिज्य शाखेतही केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. एस. एन. पटवे सहायक शिक्षण संचालक