जिचकार कुटुंबाचे अतिक्रमण
By Admin | Updated: June 13, 2014 01:28 IST2014-06-13T01:28:18+5:302014-06-13T01:28:18+5:30
बोखारा नाल्यावरील अतिक्रमित भागात दिवंगत माजी मंत्री श्रीकांत जिचकार यांची मुलगी मैत्रेयी व मुलगा याज्ञवल्क्य यांच्या नावाने जागा असल्याचा खुलासा झाला आहे. तहसीलदार (ग्रामीण) शोभाराम मोटघरे यांनी

जिचकार कुटुंबाचे अतिक्रमण
बोखारा नाल्यावरील अतिक्रमण : प्रशासनाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
नागपूर : बोखारा नाल्यावरील अतिक्रमित भागात दिवंगत माजी मंत्री श्रीकांत जिचकार यांची मुलगी मैत्रेयी व मुलगा याज्ञवल्क्य यांच्या नावाने जागा असल्याचा खुलासा झाला आहे. तहसीलदार (ग्रामीण) शोभाराम मोटघरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब पुढे आली आहे. सर्व्हे क्र. १०३-२ ही १.०६ हेक्टर जागा मैत्रेयी व याज्ञवल्क्यच्या नावाने आहे.
८० फूट रुंदीचा भोकारा नाला अतिक्रमणामुळे १० फुटांचा झाला आहे. न्यायालयाने गेल्या तारखेला या प्रकरणाची चौकशी करून ११ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्तिश: उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मोटघरे यांनी शासनाच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर केले. भूमी अभिलेख (ग्रामीण) विभागाचे उपअधीक्षक, नायब तहसीलदार (ग्रामीण), महसूल निरीक्षक आदी अधिकाऱ्यांनी ६ जून रोजी भोकारा नाल्यावरील अतिक्रमणाची चौकशी केली. त्यांना भोकारा नाल्याच्या ०.३७ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण आढळून आले आहे. अतिक्रमित भागात मैत्रेयी व याज्ञवाल्क्यसह संतकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था, ताजकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था, महालक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्था, हिंद हॉटेल आदींच्या नावानेही जमीन असल्याची माहिती मोटघरे यांच्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. शासकीय अधिकारी व भूमाफिया यांनी मौजा बोखारा येथील नाला बुजवून, त्यावर ले-आऊट पाडून भूखंड विकले आहेत. २००४ मध्ये आमदार शोभा फडणवीस यांनी विधानसभेमध्ये बोखारा नाल्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न उपस्थित केला होता. १७ जून २०१३ रोजी नायब तहसीलदारांनी गोधनी रेल्वेचे मंडळ अधिकारी व बोखाराचे तलाठी यांना नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. तसेच पोलीस उपायुक्त, ग्रामसेवक व ग्रामपंचायतला पत्र लिहिले होते. परंतु गेल्या १० वर्षांत काहीच झाले नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. अॅड. श्रीकांत खंडाळकर यांनी याचिकाकर्त्यातर्फे तर मध्यस्थ अॅड. सतीश उके यांनी स्वत: बाजू मांडली.(प्रतिनिधी)