कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेची कसोटी
By Admin | Updated: May 16, 2014 00:45 IST2014-05-16T00:45:22+5:302014-05-16T00:45:22+5:30
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार पार पाडण्यासाठी कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेची कसोटी लागणार आहे. यात कर्मचारी कमी पडले तर वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे.

कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेची कसोटी
मतमोजणीचे वेळापत्रक: तरणार की कोलमडणार? नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार पार पाडण्यासाठी कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेची कसोटी लागणार आहे. यात कर्मचारी कमी पडले तर वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला कळमना मार्केट यार्डमध्ये सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या चौकटीत जिल्हा प्रशासनाने मतमोजणीचे नियोजन केले आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्र आणि टेबलची एकूण संख्या यावरून फेर्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. या प्रमाणानुसार नागपुरात १५ तर रामटेकमध्ये १८ फेर्या होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्हाधिकार्यांनी सांगितल्यानुसार पहिल्या फेरीच्या मतगणनेला साधारणपणे ४५ मिनिट व त्यानंतरच्या प्रत्येक फेरीला २0 ते २५ मिनिट इतका वेळ लागण्याची शक्यता आहे. या वेळापत्रकानुसार अंदाज बांधला तर नागपूरच्या मतमोजणीला सात तास व रामटेकच्या मतमोजणीला ९ तास लागण्याची शक्यता आहे. या वेळेचा आधार घेतला तर नागपूरची मतमोजणी ३ वाजेपर्यंंत आणि रामटेकची मतमोजणी ५ वाजेपर्यंत संपायला हवी. जिल्हाधिकार्यांनी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यास दुपारचे ४ वाजेल असे सांगितले आहे. निकाल जाहीर होण्यासाठी ६ वाजताची वेळ निश्चित केली आहे. मतमोजणीसाठी १४५0 कर्मचार्यांनी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना दोन टप्प्यात प्रशिक्षणही देण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेची कसोटी लागणार आहे. पूर्ण क्षमतेने काम केले तरच वेळापत्रक यशस्वी ठरू शकते. २00९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव यासंदर्भात बोलका आहे. कामठी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान केंद्र असूनही तेथील मोजणीची प्रक्रिया दुपारपर्यंंतच संपली होती. मात्र त्यापेक्षा कमी मतदान केंद्र असणार्या शहरातील काही विधानसभा मतदारसंघात ही प्रक्रिया सायंकाळपर्यंंत सुरू होती. यावेळीही असे प्रकार होणार नाही असे खात्रीपूर्वक कुणीच सांगायला तयार नाही. कर्मचार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या असल्या तरी त्यांच्याकडून आकडे नोंदविताना चुका होण्याचे प्रकार यापूर्वीच्या निवडणुकीत झाले आहेत. या शिवाय आयोगाने अनेक प्रपत्रात माहिती मागितली आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही माहिती द्यावी लागणार आहे. कर्मचार्यांना खानपानासाठीही वेळ द्यावा लागतो. ही संपूर्ण प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे हे कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेवरच अवलंबून आहे. निर्धारित वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (प्रतिनिधी)