लोकसभा निकालाने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला जोर
By Admin | Updated: May 20, 2014 01:00 IST2014-05-20T01:00:31+5:302014-05-20T01:00:31+5:30
लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना युतीला विदर्भात १०० टक्के यश मिळाले आहे. विदर्भात भाजपाला नाग विदर्भ आंदोलन समितीने एका अटीवर जाहीर पाठींबा दिला होता

लोकसभा निकालाने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला जोर
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना युतीला विदर्भात १०० टक्के यश मिळाले आहे. विदर्भात भाजपाला नाग विदर्भ आंदोलन समितीने एका अटीवर जाहीर पाठींबा दिला होता. त्यामुळे भाजपला विदर्भात मोठा फायदा झाला. स्वतंत्र विदर्भ राज्य द्यावे अशी समितीची अट होती. भाजपही स्वतंत्र विदर्भ राज्याचा पुरस्कर्ता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाने स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. महाराष्टÑातील विदर्भाचा भाग वीज व खनिज संपत्तीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. राज्यातील ७० टक्के वीज विदर्भात निर्माण केली जाते. कोळसा, सिमेंट आदींच्या खाणीही विदर्भात आहे. राज्यातील ७८ टक्के जंगल एकट्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. मोठ्या प्रमाणात नद्याही याच भागात आहेत. स्वतंत्र विदर्भाची मागणी १९६० पूर्वीची आहे. ही मागणी घेऊन समितीचे सर्वेसर्वा श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी अनेक आंदोलने केलीत. या मागणीचा कायम पुरस्कार केला. परंतु काँग्रेसप्रणीत सरकारने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. भाजपने १९९१ मध्ये युती सरकारच्या काळात स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात घेतला होता. आजही भाजप विदर्भाचा पुरस्कर्ता आहे. मात्र शिवसेना त्यांचा मित्र असल्याने भाजपची अडचण आहे. परंतु १६ व्या लोकसभेच्या निवडणुकीत नाग विदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी वर्धा येथे नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पक्षाला जाहीर पाठींबा दिला होता. या मोबदल्यात भाजप सत्तेवर आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य द्यावे, अशी त्यांची मागणी होती. गडचिरोली-चिमूर, नागपूर, चंद्रपूर-वणी या लोकसभा मतदार संघात समितीचा मोठा गोतावळा आहे. या पाठिंब्याचा फायदा भाजपला झाला. आता भाजपची केंद्रात एकहाती सत्ता असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य देणे सहज शक्य आहे. यापूर्वी भाजपने छत्तीसगड, झारखंड ही लहान राज्ये निर्माण केली आहेत. त्यामुळे विदर्भालाही न्याय द्यावा, अशी मागणी नाविसचे केंद्रीय अध्यक्ष राजे अम्ब्रीशरराव महाराज यांनी केली आहे व लवकरच ते या संदर्भात भाजपच्या नेत्यांशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. भाजपच्या चंद्रपूर जिल्ह्यातील आमदारांनीही स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला अनुकूलता दर्शविली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)