लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वत:चे अपहरण नाट्य रचले. त्याच्या या कथित अपहरणात त्याचे दोन बालमित्रही सहभागी झाले. या तिघांनी शनिवारी दुपारी तब्बल तीन तासापर्यंत शहर पोलीस दलाची भंबेरी उडवून दिली.मेकोसाबाग, जरीपटक्यातील दोन १२ वर्षीय मुले आशू (नाव काल्पनिक, वय १४) याच्या घरी शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास आली. पांढऱ्या व्हॅन(कार)मध्ये आलेल्या काही जणांनी आशूला कारमध्ये कोंबले. आम्ही त्यांच्याकडे दगड भिरकावला म्हणून ते आशूलाच घेऊन पळून गेले, अशी माहिती त्यांनी आशूच्या आईवडिलांना दिली. मुलाचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने हादरलेल्या पालकांनी जरीपटका ठाणे गाठून तक्रार नोंदवली. अधिवेशनाच्या निमित्ताने शहरभर मोठा पोलीस ताफा असताना एका शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याची तक्रारवजा माहिती मिळाल्याने पोलिसांचे धाबे दणाणले. ठाणेदार पराग पोटे यांनी तातडीने नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहर तसेच आजूबाजूच्या पोलिसांना ही माहिती कळविली. त्यानंतर प्रत्यक्षदर्शी मुलांना घेऊन ते कथित घटनास्थळाकडे निघाले. तेथे हे दोघे वगळता कुणीच अशी घटना घडल्याबाबत दुजोरा देत नव्हते. त्यामुळे जरीपटकाच नव्हे तर अवघे शहर पोलीस दल कथित अपहरणकर्ते आणि पांढºया व्हॅनचा शोध घेण्यासाठी धावपळ करू लागले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना हे कळताच त्यांनीही जरीपटका पोलीस ठाणे गाठले. दुपारचे २ वाजले मात्र कथित अपहरणकर्ते आणि आशू सापडता सापडेना. आशूचे नातेवाईक, ही घटना सांगणारी ती दोन मुले, त्यांचे नातेवाईक आणि आजूबाजूची मंडळी या प्रकरणावर पोलीस ठाण्यात मंथन करीत असताना अचानक आशूच्या वडिलांना त्यांच्या भाच्याचा गोंदियाहून फोन आला. आशू माझ्यासोबत आहे. त्याला मी रेल्वेस्थानक गोंदिया येथे उतरवून घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ‘त्या दोघांना’ बोलते केले. पुढे आलेली माहिती पोलिसांसकट साºयांनाच चाट पाडणारी होती.निरागसता अन् गंभीरपणा चक्रावून टाकणाराआशूचे शाळा आणि अभ्यासात फारसे मन लागत नसल्यामुळे त्याच्या आईने शुक्रवारी त्याची खरडपट्टी काढली. आईकडून मार मिळाल्याने आशू कमालीचा अस्वस्थ झाला. रात्री झोपेतच त्याने स्वत:च्या कथित अपहरणाचा कट रचला. सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्याने त्याच्या दोन बालमित्रांना या अपहरण नाट्यात सहभागी करून घेतले. तिघेही सायकलने रेल्वेस्थानकावर पोहचले.आशूने गोंदियाची रेल्वेगाडी पकडली तर, हे दोघे घराकडे परतले. आशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी आशूच्या आईवडिलांना कथित अपहरणाची कथा सांगितली. पोलिसांनाही अपहरण नाट्य कसे घडले ते सांगत होते. पोलिसांशी बोलताना ते कधी घाबरल्यासारखे करीत होते. कधी गंभीरपणे तर कधी निरागसपणे पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. अडीच-तीन तास ते खोटे बोलत आहेत, असा साधा संशयही त्यांनी पोलिसांना येऊ दिला नाही.साऱ्यांचाच जीव पडला भांड्यातआशूच्या वडिलांना मात्र तो घरून पळून गोंदियाला गेला असावा, असा सुरुवातीपासूनच संशय होता. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्यापूर्वीच त्यांच्या गोंदियातील भाच्याला फोन करून रेल्वेस्थानकावर थांबायला सांगितले होते. त्यानुसार, भाचा रेल्वेस्थानकावर थांबला अन् आशू रेल्वेत दिसताच त्याने त्याला तेथे उतरवून घेत त्याच्या वडिलांना फोन केला. आशूने स्वत:च त्याच्या अपहरणाचे नाट्य रचले होते अन् त्यात त्याचे दोन बालमित्रही सहभागी होते, हे उघड झाल्यानंतर पालकांसह पोलिसांचाही जीव भांड्यात पडला.
नागपुरात आठवीच्या विद्यार्थ्याने रचले अपहरण नाट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:57 IST
आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वत:चे अपहरण नाट्य रचले. त्याच्या या कथित अपहरणात त्याचे दोन बालमित्रही सहभागी झाले. या तिघांनी शनिवारी दुपारी तब्बल तीन तासापर्यंत शहर पोलीस दलाची भंबेरी उडवून दिली.
नागपुरात आठवीच्या विद्यार्थ्याने रचले अपहरण नाट्य
ठळक मुद्देबालमित्रांचाही सहभाग : शहर पोलिसांची उडाली भंबेरी