भरमसाट वाढले खाद्यतेलाचे दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST2021-01-04T04:07:39+5:302021-01-04T04:07:39+5:30
नागपूर : यंदा सोयाबीनसह सर्व खाद्यतेलाच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. सर्वाधिक ८० टक्के विकल्या जाणाऱ्या सोयाबीन तेलाने दोन महिन्यात ...

भरमसाट वाढले खाद्यतेलाचे दर
नागपूर : यंदा सोयाबीनसह सर्व खाद्यतेलाच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. सर्वाधिक ८० टक्के विकल्या जाणाऱ्या सोयाबीन तेलाने दोन महिन्यात तब्बल ३५ रुपयांनी वाढून किरकोळ बाजारात प्रति किलो १३५ रुपयाचा आकडा गाठला आहे. त्याखालोखाल विकले जाणारे सूर्यफूल तेल १४५ रुपयावर पोहोचले आहे. दरवाढीमुळे स्वयंपाकघरात तेलाची फोडणी महाग झाली असून, गरीब व सामान्यांची ओरड सुरू आहे. जबाबदार अधिकारी दरवाढीवर मूग गिळून बसल्याने साठेबाजारांना दरवाढीसाठी रान मोकळे झाल्याचा ग्राहक आणि ग्राहक संघटनांचा आरोप आहे.
यावर्षी देशात सोयाबीन आणि पाम कच्च्या तेलाची ६० टक्के आयात होत आहे. आयात खर्च वाढल्याने देशांतर्गत स्थानिक बाजारपेठांमध्ये खाद्य तेलाच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. दुसरीकडे सोयाबीनला जास्त भाव मिळत नसताना तेलाचे भाव का वाढत आहेत, हा गंभीर प्रश्न आहे. दरदिवशी होणाऱ्या दरवाढीने ग्राहक त्रस्त आहेत. प्रशासनाने साठेबाजांवर धाडी टाकून तेलाचा साठा बाजारात आणल्यास काही प्रमाणात किमती कमी होण्यास मदत होणार आहे.
इतवारीतील राणी सती एन्टरप्राईजेसचे संचालक अनिल अग्रवाल म्हणाले, देशात यंदा सोयाबीनचे पीक ३० टक्के आले आहे, शिवाय अर्जेंटिना आणि ब्राझील देशातून सोयाबीन कच्च्या तेलाची आयात कमी असल्याने देशांतर्गत स्थानिक बाजारापेठांमध्ये गेल्या दोन महिन्यात सर्व खाद्यतेलाच्या किमतीत किरकोळमध्ये प्रति किलो २५ ते ३५ रुपयापर्यंत वाढ झाली आहे. दरदिवशी दर वाढतच आहेत. दर आणखी किती वाढतील, हे सांगणे कठीण आहे. ठोक विक्रेत्यांकडून माल आल्यानंतर किरकोळमध्ये विक्री केल्या जाते. दरवाढीसाठी किरकोळ विक्रेते कारणीभूत नाहीत.
कच्च्या तेलाची ६० टक्के आयात
देशात जवळपास ५० टक्के सोयाबीन कच्च्या तेलाची आयात अर्जेंटिना आणि ब्राझील देशातून होते. पण यंदा भारतातसह अर्जेंटिनामध्ये पिकाला फटका बसला आहे. शिवाय चीन या देशांमधून सोयाबीनची मोठ्या प्र्रमाणात खरेदी करीत आहे. याशिवाय भारतात मलेशिया आणि इंडोनिशिया या देशातून पाम तेलाची आयात ८० टक्क्यांपेक्षा जास्त होते. भारतात केंद्र सरकारने पाम तेलावर १० टक्के आयात शुल्क कमी केले, तर मलेशियाने निर्यातीवर ८ टक्के शुल्क वाढविले. त्यामुळे देशात आयात महाग होते. त्याचा फटका पाम तेलाला बसला आहे. आयात व निर्यातीचा ताळमेळ बसत नसल्याने आणि चीन सोयाबीन मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असल्याने भारतात खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
खाद्यतेल किलो (रुपये) दरवाढीचा तक्ता :
खाद्यतेल २३ डिसें.३ जाने.
सोयाबीन १२२ १३५
सूर्यफूल १४० १४५
शेंगदाणा १६० १६०
पाम ११५ १३०
मोहरी १३० १४०
राईस १३० १३५
तिल्ली १५० १६०
जवस १२५ १३०
खोबरा २२० २३०