सणासुदीला भेसळीचे ग्रहण
By Admin | Updated: August 9, 2014 02:33 IST2014-08-09T02:33:02+5:302014-08-09T02:33:02+5:30
श्रावण महिन्यापासून सुरू झालेल्या सणानिमित्त बाजारपेठेत विविध खाद्य पदार्थांची रेलचेल असते. याच कालावधीत पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारी अन्न प्रशासन विभागाकडे आल्या आहेत.

सणासुदीला भेसळीचे ग्रहण
नागपूर : श्रावण महिन्यापासून सुरू झालेल्या सणानिमित्त बाजारपेठेत विविध खाद्य पदार्थांची रेलचेल असते. याच कालावधीत पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारी अन्न प्रशासन विभागाकडे आल्या आहेत. कर्मचाऱ्यांची कमतरता आणि साधनसामग्रीचा अभाव असल्याने कारवाई कशी करणार, या विवंचनेत अधिकारी पडले आहेत. लवकरच कठोर मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी लोकमतला दिली.
आपल्याकडे भेसळीचा प्रकार नवीन नाहीत. रोजच्या खाण्यापिण्यातील बहुतेक सर्व पदार्थांतून कमी-अधिक भेसळ सर्रास होत असते. सकाळच्या दुधापासून रात्री जेवणानंतर खाण्याच्या पदार्थांपर्यंत सर्वत्र भेसळीने हातपाय पसरले आहेत. आता हा भेसळीचा कॅन्सर उपवासाच्या पदार्थांपर्यंत पोहोचावा, हे तेवढेच काळजीचे आहे. या भेसळीला आळा घालण्याची प्रमुख जबाबदारी शासन यंत्रणेवर जेवढी आहे तेवढीच ती ग्राहक या नात्याने जनतेवरही येते. उघड्यावरील अथवा साधारण पॅकिंग केलेल्या पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कुठलीही वस्तू खरेदी करताना केवळ स्वस्त या आकर्षणाला बळी न पडता मालाचा दर्जा, गुणवत्ता, त्याचा ताजेपणा, पॅकिंग, एक्स्पायरी मुदत या साऱ्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत. किमान खाण्यापिण्याचे पदार्थ घेताना काळजी घ्यावी.
भेसळीचा कॅन्सर, शिक्षेचे प्रमाण कमी
भेसळीमागे केवळ नफाखोरी हाच उद्देश असतो. दूध, दुधाचे पदार्थ, डाळी, मसाल्याचे पदार्थ, चहा-साखर, मध, भाजीपाला, फळे, शक्तिवर्धक पेय, एवढेच नव्हे तर लहान मुलांच्या चॉकलेटपर्यंत भेसळीचा कॅन्सर पसरलेला आहे. भेसळप्रकरणी पुढे कुणावर किती कारवाई झाली हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. भेसळीचे गुन्हे दाखल होऊन शिक्षा होण्याचे प्रमाण एकूणच कमी आहे. महाराष्ट्रात या बद्दलची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत.
दुष्परिणामाची शक्यता
खाद्य पदार्थांत वापरण्यात येणाऱ्या धुण्याच्या सोड्यामुळे आतड्याचे आणि पोटाचे विकार होतात. खाद्य तेलातील भेसळीमुळे अपंगत्व येण्याची भीती आहे. डाळ पावडर, अथवा मिठाईला देण्यात येणाऱ्या मेटॅनील येलो किंवा इतर प्रतिबंध केलेल्या रंगामुळे किडनीचे गंभीर आजार होतात.
अशी घ्या काळजी
शिळे अन्न पदार्थ, मसालेदार खाणे टाळावे. प्लेट स्वच्छ असल्याची खात्री करावी. लिखाण केलेले कागद अथवा पेपरवर गरम पदार्थ ठेवू अथवा देऊ नये. (प्रतिनिधी)