मुख्यमंत्र्यांच्या भेटीतील गावांनाच मदतीची हुलकावणी
By Admin | Updated: May 14, 2014 02:04 IST2014-05-14T00:12:26+5:302014-05-14T02:04:19+5:30
दारव्हा तालुक्यात बर्फवृष्टीसारखी गारपीट झाली. प्रचंड नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले. मदतीची यादीही लागली. मात्र ज्या गावाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली

मुख्यमंत्र्यांच्या भेटीतील गावांनाच मदतीची हुलकावणी
संतोष तांगडे - बोरीअरब (यवतमाळ)
दारव्हा तालुक्यात बर्फवृष्टीसारखी गारपीट झाली. प्रचंड नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले. मदतीची यादीही लागली. मात्र ज्या गावाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली त्या गावांची नावेच मदतीच्या यादीत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
यवतमाळ जिल्हय़ात मार्च महिन्यात प्रचंड गारपीट झाली. संपूर्ण रबी हंगाम उद्ध्वस्त झाला. दारव्हा तालुक्यातील बोरीअरब आणि कंझारा परिसरातही बर्फवृष्टीचा झाली. संपूर्ण शेतशिवार गारांमुळे पांढरे झाले होते. लाखो रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण १२ मार्च रोजी बोरीअरब येथे आले. कंझारा शिवारातील किरण कावरे यांच्या शेतीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी उपस्थित शेतकर्यांपुढे तत्काळ मदतीचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री गेल्यानंतर गारपीटग्रस्त भागाचे सर्वेक्षण झाले. कृषी विभागाने तहसीलला याद्या पाठविल्या. दारव्हा तालुक्यासाठी साडेबारा कोटी रुपये मदतही आली. १0६ गावांचे वाटप जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू झाले. मात्र या मदतीच्या यादीत मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेले बोरीअरब आणि कंझारी ही दोन गावे दिसतच नव्हती. हा प्रकार पाहून शेतकरी अचंबित झाले. अधिक चौकशी केली असता कृषी सहायकाने या दोन गावांचे सर्व्हेक्षण करून यादी कृषी विभागाला उशिरा पाठविली. एवढेच नाही तर ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर यादी प्रसिद्धही केली नाही.
परिणामी कृषी विभागाकडून तहसीलकडे आणि तहसीलकडून बँकेकडे या गावातील शेतकर्यांची नावेच आली नाही.
बोरीअरब येथे गारपिटीत १२३ शेतकर्यांचे नुकसान झाले असून त्यांना १९ लाख ७0 हजार ४00 रुपये तर कंझारा येथील ६७ शेतकर्यांसाठी ९ लाख ६२ हजार ५00 रुपये मंजूर झाले आहे. आता कुठे या याद्या तहसीलमध्ये आल्या. तेथून बँकेत येतील आणि नंतर शेतकर्यांना वाटप होईल. मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेल्या दोन गावांना पहिल्या टप्प्यातच मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु दप्तर दिरंगाईने ही दोन गावेच मदतीपासून वंचित आहेत. यामुळे शेतकर्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.