पेट्रोल टाकून पेटविल्याने समाजमन सुन्न
By Admin | Updated: May 19, 2014 00:42 IST2014-05-19T00:42:20+5:302014-05-19T00:42:20+5:30
जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात येणार्या कवलेवाडा या गावातील एका दलित व्यक्तीला रॉकेल टाकून पेटविण्याच्या प्रकरणाने सर्व गावच सुन्न झाले आहे.

पेट्रोल टाकून पेटविल्याने समाजमन सुन्न
गोंदिया जिल्ह्यातील घटना : सहाही संशयित आरोपींना अटक व २२ मेपर्यंत पोलीस कोठडी
कवलेवाडा (जि. गोंदिया) : जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात येणार्या कवलेवाडा या गावातील एका दलित व्यक्तीला रॉकेल टाकून पेटविण्याच्या प्रकरणाने सर्व गावच सुन्न झाले आहे. ज्या जागेवरून दोन महिन्यांपूर्वी वाद झाला होता तो वाद त्याचवेळी मिटला होता. असे असताना अचानक ही घटना कशी घडली, याचेच सर्वांना आश्चर्य वाटत आहे. दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या संजय खोब्रागडे यांनी आपल्या जबानीत नावे सांगितलेले गोरेगाव तालुका भाजपचे महामंत्री ऋषिपाल टेंभरे, त्यांची पत्नी व गावच्या सरपंच माधुरी टेंभरे, राष्टÑवादीचे पदाधिकारी तथा माजी जि.प. सदस्य डॉ. श्रीप्रकाश रहांगडाले, भाऊलाल हरिणखेडे, आणि खोब्रागडे यांच्या घराजवळच राहणार्या पुनाजी ठाकरे व हेमंत ठाकरे या बापलेकांना अटक करण्यात आली आहे. त्यांना २२ तारखेपर्यंत पीसीआर मिळाला आहे. कवलेवाड्यात प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता गावात असा गंभीर प्रकार होऊ शकतो, यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. या गावात ५० वर्षापूर्वीपासून संत बाह्याबाबांची समाधी व मठ आहे. मठाच्या परिसरातील जवळपास दोन एकर जागा आबादी जागेवर अनेक वर्षांपासून मठाच्या समितीचे अधिपत्य आहे. त्यामुळे याच जागेवर ग्रामपंचायतमार्फत सरकारी अनुदानातून समाजभवनाचे बांधकाम सुरू आहे. याच जागेशेजारी या घटनेतील जखमी संजय खोब्रागडे यांच्यासह दलित समाजाची चार-पाच घरे आहेत. दलित समाजाची इतर घरे मुख्य गावात आहेत. गावकर्यांच्या म्हणण्यानुसार खोब्रागडे यांनी त्या जागेवर गौतम बुद्ध आणि डॉ.आंबेडकरांचे पुतळे बसविण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यासाठी बाह्याबाबा मठ समितीने प्रस्तावित समाजभवनाचे बांधकाम १० फूट मागे घ्यावे अशी मागणी त्यांनी केली होती. समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीप्रकाश रहांगडाले यांनी त्यानुसार १० फूट जागा सोडली. पण नंतर आणखी जागेची मागणी करण्यात आल्याने पंचशील ध्वज गाडलेल्या जागेपासून २३ फूट जागा सोडून समाजभवनाचे बांधकाम सुरू करण्यात आल्याचे उपसरपंच मनोहर ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याप्रमाणे हे प्रकरण दोन महिन्यांपूर्वीच मिटले होते. आता कोणताही वाद-विवाद नव्हता. तरीही अचानक दि. १६ च्या मध्यरात्री २ वाजता संजय टेंभरे यांना झोपेतच रॉकेल टाकून पेटविण्यात आले. नायब तहसीलदारांनी घेतलेल्या मृत्यूपूर्व जबानीत त्यांनी ज्यांची नावे घेतली त्या सर्वांना पोलिसांनी अटक केली असली तरी खरे आरोपी तेच आहेत की नाही याबद्दलही गावकरी आणि पोलिसांना साशंकता आहे. त्यामुळे पोलीस वेगवेगळ्या कोणातून या घटनेची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न करीत आहेत. जखमी खोब्रागडे यांचे जळालेले कपडे पोलिसांनी जप्त केले असून ते रासायनिक परीक्षणासाठी पाठविण्यात आले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक गिºहे यांनी सांगितले. अनेक दलित संघटनांनी याप्रकरणाचा निषेध नोंदविला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)