राजेशने बांधले स्वप्नाचे मनोरे
By Admin | Updated: September 5, 2014 01:07 IST2014-09-05T01:07:44+5:302014-09-05T01:07:44+5:30
क्रूरकर्मा राजेश धन्नालाल दवारे (वय १९) हा विकृत अन् धूर्तही आहे. त्याला झटपट श्रीमंत बनायचे होते. रोज नगदी पैसे देणारा व्यवसाय थाटायचा होता अन् मोठा बंगला बांधायचा होता.

राजेशने बांधले स्वप्नाचे मनोरे
नागपूर : क्रूरकर्मा राजेश धन्नालाल दवारे (वय १९) हा विकृत अन् धूर्तही आहे. त्याला झटपट श्रीमंत बनायचे होते. रोज नगदी पैसे देणारा व्यवसाय थाटायचा होता अन् मोठा बंगला बांधायचा होता. त्यासाठी तो कोणत्याही थराला जाण्याची मानसिकता बाळगून होता. त्याने स्वप्नाचे मनोरे बांधले होते.
आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका निरागस जीवाला त्याने क्रूरपणे संपवले. एका हसत्याखेळत्या परिवाराला आयुष्यभर भळभळणारी जखम दिली अन् अवघ्या नागपूरकरांना हादरवून सोडले.
कळमन्यातील वांझरी लेआऊटमध्ये राहाणाऱ्या क्रूरकर्मा राजेश दवारेच्या घरची स्थिती जेमतेमच आहे. सोबत शिकणारे (महाविद्यालयातील) श्रीमंत घरातील तरुण झकपक कपडे, महागडे मोबाईल घेऊन मिरवतात. आलटून पालटून नवनव्या वाहनांनी फिरतात. आलिशान बंगल्यात राहतात. आपणही एक दिवस हे सर्व मिळवणार, त्यासाठी काहीही करावे लागले तरी मागेपुढे पाहणार नाही, असे तो आपल्या आप्तांना, मित्रांना सांगायचा. दुनियादारीची समझ नसल्यामुळे तो असे बरळतो,असे समजून कुणी त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नव्हते. तो कुण्या निष्पाप जीवाचा बळी घेऊन स्वप्न पूर्ण करेल, अशीही कुणी कल्पना केली नव्हती. त्याने केलेले भयावह कृत्य उघड झाल्यामुळे त्याचे आप्तस्वकीय आणि मित्र सारेच हादरले आहेत. चिमुकल्या युगचा बळी घेणाऱ्या क्रूरकर्मा राजेशच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.
बीअर बार थाटायचा
युगचे अपहरण केल्यानंतर डॉ. मुकेश चांडक यांच्याकडून १० नाही तर किमान ५ कोटी रुपये मिळतीलच, असा पक्का विश्वास क्रूरकर्मा राजेशला होता. हे पैसे मिळाल्यानंतर त्यातून शहरात बीअर बार आणि रेस्टॉरंट थाटायचे, असा त्याने विचार केला होता. बार आणि रेस्टॉरंट मधून रोजच नगदी पेसे मिळतात, उधारीची झंझट नसते, त्यामुळे त्याने बार आणि रेस्टॉरंटचा व्यवसाय करण्याचे ठरवले होते. क्रूरकर्मा राजेशचे घर दोन खोल्यांचे आहे. त्यामुळे मिळालेल्या खंडणीतून एक आलिशान बंगला बांधायचा, अशीही त्याची योजना होती.
धावत्या रेल्वेतून स्वीकारायची खंडणी
डॉ. मुकेश चांडक यांच्याकडून खंडणी कुठे आणि कशी घ्यायची, त्याचाही कट क्रूरकर्मा राजेशने रचून ठेवला होता. अपहरणाचा फोन ऐकून युगच्या परिवाराकडून खंडणी कुठे द्यायची, असा प्रश्न येईल, तेव्हा त्यांना धावत्या ट्रेनमधून खंडणीची रक्कम (रोकड असलेली बॅग) जंगलात फेकायला सांगायचे, असे क्रूरकर्मा राजेशने ठरवून ठेवले होते.
फिप्टी पर्सेंटची पार्टनरशिप
खंडणी निश्चित मिळणारच, तासा दोन तासातच आपण करोडपती होऊ, असे स्वप्न क्रूरकर्मा राजेशने अरविंदला दाखवले होते. तुला बार आणि रेस्टॉरंटमध्ये ‘फिप्टी पर्सेंटचा भागीदार बनवेल‘असेही सांगितले होते. युगच्या अपहरणात आणखी दोन मित्रांना सहभागी करण्याचा क्रूरकर्मा राजेशचा विचार होता. मात्र, त्यांना बरोबरीची रक्कम द्यावी लागेल, या विचारामुळे त्याने दोघांना आपल्या कटकारस्थानात सहभागी करण्याचे टाळले.