नागपुरात परततेय नाटकाचे गतवैभव
By Admin | Updated: June 3, 2017 02:03 IST2017-06-03T02:03:05+5:302017-06-03T02:03:05+5:30
शहराला नाटकांचा मोठा इतिहास लाभला आहे. परंतु इतिहास कितीही मोठा आणि प्रगल्भ असला तरी तो वर्तमानातूनच घडत असतो.

नागपुरात परततेय नाटकाचे गतवैभव
कलोपासकांची नांदी : हेमेंदू, बहुजन रंगभूमी, भाकरे फाऊंडेशन, दारव्हेकर स्मृती समितीचा पुढाकार
शफी पठाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराला नाटकांचा मोठा इतिहास लाभला आहे. परंतु इतिहास कितीही मोठा आणि प्रगल्भ असला तरी तो वर्तमानातूनच घडत असतो. पुढे वर्तमानाला आधुनिक मनोरंजनाची शेकडो साधने मिळाली आणि शहरातील समृद्ध रंगभूमी या आधुनिक साधनांच्या झगमगाटात झाकोळली गेली. ज्यांच्या रक्तात नाटक आहे त्या वेड्या रंगकर्मींना अधूनमधून काहीतरी सुचायचे आणि पडद्यामागे थोडीफार हालचाल व्हायची. परंतु ‘काँक्रिट’ असे काही घडत नव्हते. आता मात्र चित्र बदलत आहे. हेमेंदू रंगभूमी, संजय भाकरे फाऊंडेशन, पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती समिती,बहुजन रंगभूमी यासारख्या विविध विचारधारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाट्यसंस्थांनी शहरातील नाटक जिवंत ठेवण्यासाठी पुढाकार घेतला असून यातील सातत्य कायम राहिले तर रंगभूमीचे गतवैभव परत मिळेल, असे आशावादी चित्र निर्माण झाले आहे. नाटक हा साहित्यप्रकार कथा, काव्य, कादंबरी या प्रकाराहून व्यापक व जिवंत आविष्कार आहे. नाटक सतत नित्यनवीन व निरंतर प्रक्रिया आहे. बदलत्या शैलीचे व प्रेक्षकांचे भान ठेवून नाटककाराने नाटकाचा वेध घेणे आवश्यक आहे. जुन्या रंगभूमीच्या परंपंरेचे जतन करतानाच बदलत्या रंगभूमीची तंत्रे आत्मसात करून नाटककारांनी पुढे जायला हवे, हे शहरातील नाट्यकर्मींना चांगले कळले आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसायला लागले आहेत.
भाकरे फाऊंडेशनने जागवली उमेद
शहरात नाटकाचे रोपटे रुजावे, ते बहरावे यासाठी संजय भाकरे फाऊंडेशनने सुरू केलेले कार्य कौतुकास्पद आहे. या संस्थेच्या शृंखलाबद्ध कार्यक्रमांतर्गत नुकतीच २५वी एकांकिका स्पर्धा सादर झाली. यावेळी साई सभागृहात पाय ठेवायलाही जागा नव्हती. नागपूरच्या नाट्यचळवळीसाठी ही सुवार्ता आहे. नाटकाचा ना ज्यांना माहीत नव्हता अशा कलांवतांनाही या संस्थेने प्रगल्भ रंगकर्मी बनवले आहे. केवळ अभिनयच नाही तर नाटकासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक दृष्टीनेही रंगकर्मी तज्ज्ञ असावेत यासाठी विविध कार्यशाळा घेऊन तंत्रज्ञ घडविण्याचे कार्य ही संस्था करीत आहे. प्रत्येक महिन्यात एकांकिकेसोबतच आता दीर्घांकाच्या सादरीकरणाचे नियोजनही सुरू झाले आहे. नाटकात रस असणाऱ्या तरुणाईची एक मोठी टीम या संस्थेसोबत असणे ही नाट्यचळवळीच्या दृष्टीने लाभदायक गोष्ट आहे.
हेमेंदू रंगभूमीची आश्वासक सुरुवात
हेमेंदू रंगभूमीनेही शहरात आश्वासक सुरुवात केली आहे. ९ व १० एप्रिल रोजी या संस्थेने द्विदिवसीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात श्री तशी सौ व मन चिंब झाले या दोन एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले. काल-परवाच या संस्थेतर्फे आयोजित नृत्य-नाट्य शिबिराचा समारोप झाला. या संस्थेच्या माध्यमातूनही अनेक नवीन कलावंत शहराला मिळत आहेत. विशेष म्हणजे, ही सर्व मंडळी तरुण असून नाटकाप्रति समर्पणाच्या भावनेने या चळवळीशी जुळत असल्याने शहरातील नाट्यचळवळीत एक वेगळाच जोश अनुभवायला मिळत आहे.
दारव्हेकर स्मृती समितीने स्वीकारावे पालकत्व
पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तर यांनी नागपूरच्या नाट्यचळवळीचे नाव अजरामर केले. त्यांच्या या कार्याला नवीन पिढीशी जोडण्यासाठी गणेश नायडू, अजित दिवाडकर व त्यांच्या इतर ज्येष्ठ सहकाऱ्यांनी एकत्र येत पुरुषोत्तम दारव्हेर स्मृती समितीची स्थापना केली आहे. या माध्यमातून ही समिती विविध नाट्यविषयक कार्यक्रम आयोजित करीत आहे. येत्या आॅगस्ट महिन्यात या समितीचा नाट्यमहोत्सवही प्रस्तावित आहे. यामध्ये संजय भाकरे फाऊंडेशन व हेमेंदू रंगभूमीतर्फे नाटक सादर केले जाणार आहे. या संस्थेत अनेक जुन्या-जाणत्या रंगकर्मींचा सहभाग आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ शहरातील नाट्य चळवळीला होऊ शकतो. त्यामुळे या समितीने चळवळीचे पालकत्व स्वीकारावे, अशी रंगकर्मींची अपेक्षा आहे.
बहुजन रंगभूमीचा रौप्य महोत्सवी प्रवास
बुद्धिस्ट रंगमंचाबरोबर संपूर्ण संस्कृतीला पुनर्स्थापित करून नव्याने युवा पिढीसाठी रंगमंचाचे निर्माण करण्यासाठी शहरातील नाटककार वीरेंद्र गणवीर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या बहुजन रंगभूमीने नुकताच २५ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. वास्तववादी चित्रणासाठी प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र गणवीर यांच्या नाटकांनी शहरातील अनेक नवोदित कलावंतांच्या प्रतिभेला समोर आणले आहे. राज्य नाट्य स्पर्धेपासून तर व्यावसायिक नाटकांपर्यंत त्यांच्या तालमीतील अनेक कलावंतांनी पुरस्कार प्राप्त केले आहेत. याशिवाय नाटकाशी संबंधित विविध कार्यक्रम सातत्याने सुरू असल्याने शहरात नाटकाला पोषक वातावरण लाभत आहे.