डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक कधी होणार ?
By Admin | Updated: November 17, 2015 04:27 IST2015-11-17T04:27:46+5:302015-11-17T04:27:46+5:30
मुंबईतील इंदू मिलवरील स्मारकाचे भूमिपूजन झाले. लंडनमधील बाबासाहेबांच्या घराचे स्मारकात रूपांतर होऊन पंतप्रधानांच्या

डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक कधी होणार ?
आनंद डेकाटे ल्ल नागपूर
मुंबईतील इंदू मिलवरील स्मारकाचे भूमिपूजन झाले. लंडनमधील बाबासाहेबांच्या घराचे स्मारकात रूपांतर होऊन पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे लोकार्पणही झाले. परंतु नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारकाचा प्रश्न आजही कायम आहे. तब्बल २३ वर्षांपूर्वी महापालिकेने सभागृहात मंजूर केलेला हा विषय अजूनही कागदी घोड्यांच्या बाहेर येऊ शकला नाही, हे विशेष.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १९९२ साली महापालिकेने शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. महापालिका सभागृहात त्याला एकमुखाने मंजुरी सुद्धा प्रदान केली होती. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भव्य असे स्मारक होणार होते. मनपाने त्यासाठी एक समिती स्थापन केली होती. त्या समितीने पटवर्धन मैदानाची जागा स्मारकासाठी निश्चित केली. एक कोटी रुपयांची तरतूदसुद्धा महापालिकेने केली होती. परंतु त्यानंतर त्यावर काहीच काम झाले नाही. तब्बल दहा वर्ष ती फाईल धूळखात पडली होती. अधूनमधून काही आंबेडकरी संघटनांकडून स्मारकाचा मुद्दा रेटला जात होता. मात्र त्यात फारसा जोर नसल्याने मनपा प्रशासनानेही त्याकडे कधी लक्ष दिले नाही.
२००२ साली महापालिकेच्या पहिल्याच सभेत नव्यानेच निवडणून आलेल्या बहुजन समाज पार्टीच्या सदस्यांनी जन्मशताब्दी स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला. मनपाचे पक्षनेते असलेले राहुल तेलंग यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेत कामकाज बंद पाडले. तेव्हा महापौर विकास ठाकरे आणि मनपा आयुक्त टी. चंद्रशेखर होते. फाईल शोधण्यात आली. यावर चर्चा झाली. पुन्हा एक समिती स्थापन झाली. टी. चंद्रशेखर यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला. स्मारकाबाबतचे डिझाईन तयार करून घेण्यात आले. तीन हजार लोक बसू शकतील, असे भव्य वातानुकूलित सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह सर्व महापुरुषांची ग्रंथसंपदा, त्यांच्यावरील संदर्भ ग्रंथ असलेले विशाल ग्रंथालय आणि विविध विषयांवर संशोधन करणाऱ्या विद्यार्थी संशोधकांसाठी स्वतंत्र असे संशोधनालय आदींची व्यवस्था करण्याचे नियोजित होते. स्मारकाच्या या संपूर्ण प्रकल्पावर एकूण २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. दरम्यान पटवर्धन मैदानावरील लीज संपली. त्याचे नूतनीकरण करण्यासंदर्भात महापालिकेने सरकारकडे अर्ज केला. त्यासंबंधी आवश्यक रक्कमही भरली परंतु कुठे माशी शिंकली माहीत नाही. यानंतर आंबेडकरी संघटनांमध्येही नाराजी पसरली. दरवर्षी हिवाळी अधिवेशनात यावर आवाज उठवला जाऊ लागला. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी चिटणीस पार्क मैदानावर झालेल्या जाहीर सभेत सात दिवसांच्या आत हा प्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही काहीच झाले नाही. प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासनच दिले. मात्र कार्यवाही झाली नाही. दरम्यान आंबेडकरी संघटनांच्यावतीने सातत्याने आंदोलने सुरूआहेत. परंतु त्याला फारसे यश आलेले नाही.
सत्तांतरामुळे अपेक्षा वाढल्या
सध्या केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. मागील २३ वर्षांपासूनचा हा प्रश्न तत्कालीन सरकारला मार्गी लावता आला नाही. भाजपच्या काळात इंदू मिलचा प्रश्न मार्गी लागला. लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घराचे स्मारक करण्यात आले. त्यामुळे नागपुरातील डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाबाबत पुन्हा एकदा नव्याने अपेक्षा उंचावल्या आहेत.