डॉ. आंबेडकरांची जयंती क्रांतीचे तत्त्वज्ञान मांडणारी युद्धशाळा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:07 IST2021-04-18T04:07:30+5:302021-04-18T04:07:30+5:30
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशात आणि जगभरात मोठ्या हर्षोल्हासात साजरी केली जाते. आपण जयंतीचा अर्थ ...

डॉ. आंबेडकरांची जयंती क्रांतीचे तत्त्वज्ञान मांडणारी युद्धशाळा ()
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशात आणि जगभरात मोठ्या हर्षोल्हासात साजरी केली जाते. आपण जयंतीचा अर्थ बाबासाहेबांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक असा घेतला आहे. आंबेडकरी विचार हा माणसाच्या क्रांतिकारी पुनर्रचनेचा विषय आहे. हा मनोरंजनाचा, नाचगाण्याचा विषय नसून ती एका मानवमुक्तीच्या लढ्याच्या विजयाची आणि क्रांतीचे तत्त्वज्ञान मांडणारी युद्धशाळाच आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कवी, साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.
अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्यावतीने आयोजित सात दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेच्या समाराेपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, संजय मोखडे, अमृत बनसोड, संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे, सज्जन बरडे, डॉ. राजेंद्र गोणारकर, किरण पतंगे, डॉ. प्रकाश राठोड, साऊल झोटे, शालिक जिल्हेकर, सुनील कुमरे, संजय डोंगरे, भैय्यासाहेब गोडबोले प्रामुख्याने उपस्थित हाेते. पद्मश्री लक्ष्मण माने, प्रा. माधव सरकुंडे, डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. प्रकाश राठोड, डॉ. प्रतिभा अहिरे, प्रा. डॉ. अनंत राऊत यांनी विविध विषयांवर व्याख्याने दिली. डाॅ. मनाेहर म्हणाले, हा दिवस म्हणजे विषम व्यवस्थाच उद्ध्वस्त करणाऱ्या समर्थ बुद्धिवादाची ही जयंती आहे. एका विश्वविख्यात महातत्त्वज्ञानाचीच ही जयंती आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या जयंतीचे पर्व युगांतराच्या नियोजनाचे पर्व म्हणून साजरे झाले पाहिजे. डीजे लावून आणि त्याच्या तालावर बीभत्सपणे नाचून, निळ उधळून जयंती साजरी करू नये. ही बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाला, आदर्शवादाला, माणसाच्या स्वातंत्र्याला हद्दपार करण्याची ही प्रक्रिया आहे. क्रांतीला गोठविणाऱ्या व्यवस्थेचे दास्यत्व तुम्ही पत्करले पाहिजे अशी इथल्या आंबेडकरविरोधकांची अभिलाषा असते. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी जयंतीचे चिंतनशील प्रारूप समजून घेतलं पाहिजे. राजकारणाबरोबरच शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि साहित्याच्याही क्षेत्रात कोरोना शिरला आहे. गोरगरिबांना हालअपेष्टांनी या व्यवस्थेतूनच अदृश्य केल्या गेले आहे. व्यवस्थेने लोकांना मारले नाही तर विचारबंदी केली, मेंदूचीच टाळेबंदी केली तर वेगळे मारण्याची गरजच उरत नाही. अशा अत्यंत संवेदनशील काळात बौद्धिक शक्ती पणाला लावून जयंतीचे पावित्र्य, वैचारिक मूल्य अबाधित ठेवायला हवे, असे डॉ. मनोहर म्हणाले.
प्रशांत वंजारे हे संयोजक व गंगाधर ढवळे समन्वयक हाेते़ डॉ. सीमा मेश्राम, छाया खोब्रागडे, अरविंद निकोसे, सुरेश खोब्रागडे, देवानंद सुटे आदींचा आयाेजनात सहभाग हाेता़