डॉक्टर, परिचारिकांनो नम्रपणे वागा!
By Admin | Updated: May 19, 2014 00:52 IST2014-05-19T00:52:06+5:302014-05-19T00:52:06+5:30
सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी नम्रपणे वर्तणूक करा, असे फर्मान खुद्द अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांना द्यावे लागले.

डॉक्टर, परिचारिकांनो नम्रपणे वागा!
नागपूर : सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी नम्रपणे वर्तणूक करा, असे फर्मान खुद्द अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांना द्यावे लागले. या संदर्भातील एक पत्र युथ काँग्रेसलाही दिले. या पत्रामुळे आणि इतर मागण्या मान्य झाल्याने मागील चार दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण युथ काँग्रेसने मागे घेतले. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे रुग्ण त्रस्त होते. रक्तापासून ते औषधे आणि इतर चाचण्यांसाठी येथील रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखविला जात होता. यातच डॉक्टरांकडून रुग्णांना मिळणारी वागणूक सौजन्यपूर्वक नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारीला घेऊन युथ काँग्रेसच्यावतीने अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांना घेराव घालून तक्रारींचे निवेदन दिले. मात्र निराकरण होत नसल्याचे आणि रुग्णांकडून तक्रारी थांबत नसल्याचे पाहत युथ काँग्रेसने सुपर स्पेशालिटी रुग्णालयासमोर मंडप टाकून साखळी उपोषण सुरू केले. या चार दिवसांत त्यांच्याकडे शेकडो रुग्णांनी तक्रारी केल्या. यात सर्वात जास्त तक्रारी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या औषधांच्या तुटवड्यावरून, जेनेरिक औषधे लिहून देत नसल्याचे आणि डॉक्टरांच्या वर्तणुकीत नम्रपणा नसल्याच्या होत्या. युथ काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी या समस्या आमदार दीनानाथ पडोळे यांच्या नेतृत्वात अधिष्ठाता डॉ. पोवार यांच्याकडे मांडल्या. यावर अधिष्ठाता यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील सर्व डॉक्टरांना रुग्णाशी नम्रपणे वागण्याचे, रुग्णांना बाहेरून औषधे लिहून देताना शक्यतोवर जेनेरिक औषधे लिहून देण्याचे, वैद्यकीय प्रतिनिधींना (एमआरआय) बाह्यरुग्णांच्या वेळात येण्यास बंदी घालण्याच्या सूचना दिल्या. या संदर्भातील लेखी पत्र युथ काँग्रेसच्या शिष्टमंडळालाही दिले. या संदर्भात अधिक माहिती देताना युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके म्हणाले, अधिष्ठात्यांनी मागण्या मान्य केल्याने साखळी उपोषण मागे घेतले आहे. परंतु राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत अनेक समस्या आहेत. त्याच्या निराकरणासाठी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली आहे. या योजनेकडे सार्वजनिक आरोग्य विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने रुग्ण औषधांपासून वंचित आहेत. (प्रतिनिधी)