रियाज अहमद लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर :नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) हे देशातील एक प्रसिद्ध रुग्णालय मानले जाते. विदर्भाबरोबरच मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आदी राज्यांतूनही रुग्ण येथे चांगल्या व स्वस्त उपचारांसाठी येतात. लोकमतच्या टीमने आज मेडिकल सेंटरला भेट दिली, धक्कादायक परिस्थिती समोर आली. मेडिकलच्या न्यू पीजी वसतिगृहाच्या इमारतीची अनेक वर्षांपासून डागडुजी झालेली नाही की, वर्षानुवर्षे स्वच्छताही झालेली नाही, अशी स्थिती आहे. खिडक्या, दरवाजे तुटलेले आहेत आणि या परिस्थितीत डॉक्टरांना राहावे लागते आहे.
तुटलेल्या खिडक्या लाकडाच्या तुकड्यांनी झाकल्या आहेत वसतिगृहाच्या मुख्य दरवाजाची अवस्था दयनीय झाली आहे. त्यात धूळ आणि मातीचे ठिपके साचले आहेत. त्यातून दुर्गंधी पसरत आहे. वसतिगृहाच्या परिसरात मातीचे ढिगारे साचले आहेत. खोल्यांच्या खिडक्यांपर्यंत मातीचे ढीग पोहोचले व त्यांची धूळ उडत राहते. अशा परिस्थितीत पीजीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना येथे राहावे लागत आहे. इतरांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याला वैद्यकीय प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा घोर निष्काळजीपणा म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
शाखा अभियंता कार्यालयासमोर दुरवस्था मेडिकलमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांच्या कार्यालयासमोरच निष्काळजीपणा दिसून येतो. इथली स्थिती बिकट दिसते. आतून रस्त्यावर मातीचे ढीग पडले आहेत. एवढेच नाही तर कार्यालयासमोर उजवीकडे व मागे डाव्या बाजूला खोल खड्डा खोदण्यात आला आहे, गटारीचे चेंबर उघडे पडले आहे.
कोट्यवधींचा खर्च, तरी अवस्था वाईट सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मेडिकलमध्ये ५०० कोटींहून अधिकची विकासकामे करण्यात येत आहेत. सूत्रानुसार गेल्या वर्षभरात येथील व्यवस्थेवर सुमारे १० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या खिडक्या-दारांचीही वर्षानुवर्षे स्वच्छता झालेली नाही. मात्र, कागदावरच त्याच्या खर्चाचे वास्तव काही वेगळेच असल्याचे बोलले जात आहे.
पाणीही स्वच्छ आहे का? लोकमत टीम पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचू शकली नाही, मात्र या टाकीत अनेक इंच शेवाळ साचल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. वैद्यकीय प्रशासन आणि देखभालीची जबाबदारी असलेला सार्वजनिक बांधकाम विभाग याची चौकशी करणार का?
मुख्यमंत्र्यांचे जाणार का लक्ष? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ११ जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देणार आहेत. अधिकाऱ्यांना आधीच सतर्क केल्याचे बोलले जात आहे. मात्र मुख्यमंत्री केवळ सभागृहातच चर्चा करणार की कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या दुर्दशेचीही दखल घेणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.