‘विद्वत’जनांना नियम माहीत नाहीत काय?
By Admin | Updated: July 3, 2014 00:47 IST2014-07-03T00:47:30+5:302014-07-03T00:47:30+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘विद्वत’जनांचा सहभाग असतानादेखील गोंधळाची मालिका थांबण्याचे नावच घेत नसल्याचे दिसून येत आहे. प्रवेशबंदीच्या यादीतील नियमबाह्य पद्धतीने प्रविष्ट

‘विद्वत’जनांना नियम माहीत नाहीत काय?
विशेष परीक्षा : परीक्षा मंडळाचा प्रारूप तयार करण्यास नकार
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘विद्वत’जनांचा सहभाग असतानादेखील गोंधळाची मालिका थांबण्याचे नावच घेत नसल्याचे दिसून येत आहे. प्रवेशबंदीच्या यादीतील नियमबाह्य पद्धतीने प्रविष्ट विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासंदर्भात परीक्षा मंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. परंतु संबंधित मुद्यावर प्रारूप तयार करण्याचे परीक्षा मंडळाला अधिकारच नाही, अशी भूमिका सदस्यांनी घेतल्यामुळे या मुद्याला अजेंड्यावरून हटवावे लागले.
११ जून रोजी राज्य शासनाने प्रवेशबंदीच्या यादीतील महाविद्यालयांमधील प्रविष्ट विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते.
यानंतर २६ जून रोजी झालेल्या विद्वत परिषदेच्या तातडीच्या बैठकीत संस्थाचालकांच्या दबावामुळे ६३ महाविद्यालयांतील ६,६१६ विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांची परीक्षा कशी आणि कधी आयोजित करण्यात यावी, यासंदर्भात नियम ठरविण्यासाठी तसेच प्रारूप तयार करण्यासाठी संबंधित प्रस्ताव परीक्षा मंडळाकडे पाठविण्यात आला. मंगळवारी बैठक सुरू होताच संबंधित मुद्यावर प्रारूप तयार करण्यास नकार दिला. महाराष्ट्र विद्यापीठ नियमांत याची तरतूदच नसल्याने या मुद्याला बैठकीच्या अजेंड्यातून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.
परंतु जर विद्यापीठातील ‘विद्वत’ अधिकाऱ्यांना या नियमांची माहिती होती तर अजेंड्यामध्ये विशेष परीक्षेचा मुद्दा का सहभागी करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)