घाबरू नका;निर्भीड बना!

By Admin | Updated: August 14, 2016 02:34 IST2016-08-14T02:34:56+5:302016-08-14T02:34:56+5:30

आयुष्याच्या प्रवासात अनेक संकटे येतात, चढ-उतार येतात. यात प्रत्येक वेळी तुम्ही जिंकणारच असे नाही.

Do not be afraid; Be courageous! | घाबरू नका;निर्भीड बना!

घाबरू नका;निर्भीड बना!

शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप : नाना पाटेकर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
नागपूर : आयुष्याच्या प्रवासात अनेक संकटे येतात, चढ-उतार येतात. यात प्रत्येक वेळी तुम्ही जिंकणारच असे नाही. मात्र त्यामुळे निराश होऊ नका. नेहमी छान हसा. शिवाय कधीही कशालाही घाबरू नका, निर्भीड बना. परिणामाची भीती बाळगू नका, असा उपदेश प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना केला.
कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्यावतीने १० ते १३ आॅगस्ट दरम्यान नागपुरात घेण्यात आलेल्या ‘शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा’ शनिवारी समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ, वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी होते. मंचावर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर, केशवराव मानकर व राजीव हडप उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी विद्यार्थ्यांनी ‘हमर पारा; तुमर पारा आणि रेला...रेला...’ या लोकप्रिय आदिवासी गीतांवर नृत्य सादर केले. यानंतर पाहुण्यांच्या हस्ते आदर्श पर्यवेक्षक आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यावेळी नाना पाटेकर यांनी एकलव्य एकल विद्यालय ही एक शाळा नसून, संस्कार देणारी संस्था असल्याचे गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, आपण आयुष्यभर सुखाच्या मागे धावत असतो, आणि परतीच्या वेळी लक्षात येते की, सर्व व्यर्थ आहे. जोपर्यंत आपला देश हा आपल्याला आपले कुटुंब वाटत नाही, तोपर्यंत जगण्याची गंमतच येत नाही. त्यामुळे संपूर्ण देश हा आपले कुटुंब समजून काम करण्याची गरज आहे. आदिवासी क्षेत्रातील तरुण नक्षलवादी का झाले, त्यांना असे करावेसे का वाटले. नक्कीच त्याच्या पाठीमागे काही तरी कारणे असतील. ती कारणे शोधून काढली पाहिजे.
नुसते एक दुसऱ्यांना मारून चालणार नाही, तर त्यावर समाधान शोधले पाहिजे. आजपर्यंत मला मिळालेल्या सर्व पुरस्कारापेक्षा आजच्या कार्यक्रमात मला मिळालेले समाधान सर्वांत मोठे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन वीरेंद्र अंजनकर यांनी केले. तर प्रशांत बापर्डीकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

आदिवासी क्षेत्रात काम करण्याची गरज
आजही आदिवासी क्षेत्रातील स्थिती फार चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी शिक्षक आहे, तर शाळा नाही. आणि शाळा आहेत, तर शिक्षक नाही. तसेच अनेक गावांत डॉक्टर आहे, तर दवाखाने नाहीत, आणि दवाखाने आहेत, तर डॉक्टर नाही. असे चित्र दिसून येते. मात्र अशाही स्थितीत आदिवासी खडतर जीवन जगत आहे. ते विकासापासून कोसो दूर आहेत. अशा या लोकांसाठी मनात संवेदना ठेवून काम करण्याची गरज आहे. जेथे अंधार आहे, तेथे प्रकाश पोहोचला पाहिजे. मात्र हे काम करताना मनात उपकाराची भावना असू नये. शिवाय त्याचा राजकीय फायदाही घेऊ नये. केवळ सामाजिक जाणिवेतून ही कामे झाली पाहिजे. या भावनेतून कार्यकर्ते जेव्हा एकत्रित येतात, त्यातून चांगले काम घडत असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. आदिवासी क्षेत्रापर्यंत विकास पोहोचू शकलेला नाही. तेथे गरिबी, भूकमारी व बेरोजगारी सारख्या समस्या आहेत. आणि त्यातूनच नक्षलवाद पुढे आला आहे. त्यामुळे आदिवासी क्षेत्रातील लोकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. त्यांचा विकास झाला पाहिजे. यासाठी योगगुरू रामदेव बाबा यांच्या मदतीने आदिवासी क्षेत्रात प्रकल्प उभारण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. तसेच सॉईल हेल्थ कार्डप्रमाणे या आदिवासी क्षेत्रातील लोकांना आरोग्य कार्ड मिळाले पाहिजे. असेही त्यांनी सांगितले.

आदर्श शिक्षक-पर्यवेक्षकांचा गौरव
यावेळी अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते एकलव्य एकल विद्यालयासाठी आदिवासी क्षेत्रात शिक्षक व पर्यवेक्षक म्हणून काम करीत असलेल्या काही लोकांना आदर्श शिक्षक व पर्यवेक्षक पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. यात आदर्श पर्यवेक्षक म्हणून रवी भोयर आणि जानराव बेलसरे तर आदर्श शिक्षक म्हणून किशोर गुरले, ममता सूर्यवंशी, अशोक भारवे, संदीप भांडेकर व सुरेश दर्ओ यांचा समावेश होता.

 

Web Title: Do not be afraid; Be courageous!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.