मुलांनी रस्त्यावर खेळायचे काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST2021-02-06T04:11:17+5:302021-02-06T04:11:17+5:30
नागपूर : महानगरपालिकेने शहरातील ६९ उद्याने खासगी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सकाळी ९ नंतर उद्यानात जाणाऱ्या ...

मुलांनी रस्त्यावर खेळायचे काय ?
नागपूर : महानगरपालिकेने शहरातील ६९ उद्याने खासगी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सकाळी ९ नंतर उद्यानात जाणाऱ्या नागरिकांना शुल्क देऊनच आत प्रवेश करावा लागणार आहे. महापालिकेच्या या निर्णयाला समाजाच्या सर्व स्तरातून विरोध करण्यात येत आहे. परंतु गरिबांच्या मुलांनी रस्त्यावर खेळायचे काय, असा सवाल धंतोली उद्यानात आलेल्या बहुतांश नागरिकांनी करून महापालिकेच्या निर्णयाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. महापालिका आधीच वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारते. शहरातील उद्याने ही नागरिकांनी भरलेल्या कराच्या माध्यमातूनच तयार करण्यात आलेली आहेत. असे असताना उद्यानात जाण्यासाठी नागरिकांकडून प्रवेश शुल्क घेण्याचा निर्णय चुकीचा असून महापालिकेने त्वरित हा निर्णय रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
महागाईच्या काळात शुल्क आकारणे चुकीचे ()
‘महागाईच्या काळात नागरिक पैसे वाचवून आपली उपजीविका भागवित आहेत. उद्यानात शुल्क आकारल्यास गोरगरीब उद्यानात आपल्या मुलांना घेऊन येऊ शकणार नाहीत. आधीच नागरिक वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क भरतात. त्यात आणखी शुल्क आकारणे हा नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार आहे. महापालिकेने नागरिकांच्या हिताचे निर्णय घ्यायला हवेत.’
-रामकृष्ण कडुकर, ज्येष्ठ नागरिक
गरीब मुलांना खेळण्यासाठी जागा उरणार नाही ()
‘गरीब नागरिक आपल्या मुलांना खेळण्यासाठी उद्यानात नि:शुल्क प्रवेश करतात. त्यांना उद्यानात येण्यासाठी प्रवेश शुल्क आकारणे चुकीचे आहे. असे केल्यास गरीब मुलांना खेळण्यासाठी जागा उरणार नाही. मुले रस्त्यावर खेळल्यास अपघातांचे प्रमाण वाढणार आहे. गरिबांनी मनोरंजनासाठी कुठे जायचे याचे उत्तर महापालिकेने द्यायला हवे.’
-श्रेया भरतीया, गृहिणी
उद्यानाची नियमित देखभाल करावी ()
‘उद्यानात प्रवेशाचा निर्णय महापालिकेने घेतल्यास उद्यानांची नियमित देखभाल करायला हवी. उद्यानातील हिरवळ, मुलांची खेळणी दुरुस्त करावीत. फुलझाडे लावावी, नागरिकांसाठी स्वच्छ प्रसाधनगृहाची व्यवस्था करायला हवी. प्रवेश शुल्कातून मिळालेल्या पैशांचा योग्य वापर महानगरपालिकेने करण्याची गरज आहे.’
-वासुदेव काळे, ज्येष्ठ नागरिक
मुलांच्या खेळण्यावर निर्बंध नको ()
‘लहान मुलांना उद्यानात खेळायला मिळाले नाही तर ते टीव्ही, मोबाईलवर टाइमपास करतील. त्यांच्या आरोग्यासाठी त्यांना उद्यानात नि:शुल्क प्रवेश देण्याची गरज आहे. शुल्क घेतल्यास ज्येष्ठ नागरिक, महिला उद्यानात येण्याचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने शुल्क लावण्याचा निर्णय मागे घ्यावा.’
-रुचिका साहु, चार्टर्ड अकाऊंटंट
प्रवेशासाठी शुल्क घेणे धक्कादायक ()
‘सार्वजनिक उद्यानात प्रवेशासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय चुकीचा आहे. आधीच महापालिका नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स घेते. मग गार्डनमध्ये प्रवेशासाठी वेगळे शुल्क घेण्याचा प्रकार धक्कादायक आहे. महापालिकेच्या या निर्णयास सर्वांनी विरोध करून हा निर्णय मागे घेण्यास बाध्य करण्याची गरज आहे.’
-राहुल चौधरी, सेल्स मॅनेजर, महिंद्रा फायनान्स
आरोग्यावर शुल्क लावणे चुकीचे ()
‘शासन आरोग्याप्रति जागरुक आहे. उद्यानात सर्वजण आरोग्य चांगले राहण्यासाठी येतात. ग्रीन जीममध्ये व्यायाम करतात. त्यामुळे आरोग्यावर शुल्क लावणे चुकीचे आहे. नागरिक उद्यानात आले नाहीत, तर त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होईल. त्यामुळे प्रवेश शुल्क आकारणे टाळावे.’
-इंद्रकुमार सूर्यवंशी, ज्येष्ठ नागरिक
मॉर्निंग वॉकला जायचे कुठे ()
‘सकाळी अनेकजण मॉर्निंग वॉकसाठी उद्यानात येतात. परंतु शुल्क लावल्यामुळे कुणीच उद्यानाकडे फिरकणार नाही. लहान मुलांकडूनही खेळण्यासाठी पैसे घेणे चुकीचे आहे. उद्यानात मोकळी हवा असते. त्यामुळे आरोग्यासाठी सर्वजण उद्यानात येतात. शुल्क लावल्यास मॉर्निंग वॉकसाठी कुठे जायचे याचे उत्तर महापालिकेने द्यावे.’
-केतकी सोहनी, विद्यार्थिनी
टॅक्स दिल्यावर वेगळे शुल्क नको ()
‘उद्यानात प्रवेशासाठी शुल्क आकारल्यास गरीब लोक उद्यानात येणार नाहीत. गरिबांच्या मुलांना उद्यानात खेळणे कठीण होईल. महागाईच्या काळात प्रत्येकजण पैसे वाचविण्याचा प्रयत्न करतो. नागरिक अनेक प्रकारचे टॅक्स महापालिकेकडे भरतात. त्यावरही वेगळे शुल्क आकारणे टाळण्याची गरज आहे.’
-मंगेश चंदनखेडे, मेट्रो रेल्वे, कर्मचारी
रस्त्यावर अपघात वाढतील ()
‘उद्यानात शुल्क घेणे सुरु केल्यास लहान मुले रस्त्यावर खेळतील आणि अपघातांचे प्रमाण वाढेल. महिला रस्त्यावर मॉर्निंग वॉकला गेल्यास त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार घडतील. त्यामुळे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने उद्यानात प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घ्यावा.’
-अश्विन चव्हाण, पोलीस
...........................