जिल्हा प्रशासनाचे मिशन मान्सून
By Admin | Updated: June 13, 2014 01:23 IST2014-06-13T01:23:06+5:302014-06-13T01:23:06+5:30
पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याला तोंड देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे व जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्याकडे

जिल्हा प्रशासनाचे मिशन मान्सून
अधिकाऱ्यांची नियुक्ती : कामांचे वाटप
नागपूर : पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याला तोंड देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे व जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्याकडे तहसील आणि उपविभागातील नुकसानाची माहिती घेणे आणि मदत व पुनर्वसनाची सोय करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्याकडे नैसर्गिक आपत्तीचा अहवाल शासनाकडे पाठविणे, तसेच सर्व विभागाशी समन्वय राखण्याचे काम सोपविण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके यांच्याकडे पात्र लाभार्थ्यांना मदतीचे वाटप व त्याचा अहवाल शासनाकडे पाठविणे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रकाश पाटील यांच्याकडे पूरग्रस्तांसाठी मदत, पुनर्वसनाची सोय करणे, तसेच सैन्याच्या मदतीची गरज भासल्यास किंवा हेलिकॉप्टरची गरज पडल्यास त्याची व्यवस्था करणे आणि मंत्र्यांचे दौरे असतील तर त्याची तयारी करणे आदी कामे सोपविण्यात आली आहेत. उपजिल्हाधिकारी प्रदीप डांगे हे पाटील यांना सहकार्य करणार आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके व जिल्हा खनिकर्म अधिकारी गोसावी यांच्याकडे पूरग्रस्तांना मदत पुरविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी आशा पठाण व सुजाता गंधे यांच्याकडे पूरग्रस्त भागात मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा करणे तसेच पिकांची हानी, रस्ते व पुलांच्या हानीची माहिती घेण्याचे काम सोपविण्यात आले आहे.
उपजिल्हाधिकारी जगदीश संगीतराव आणि प्रकाश वर्मा यांच्याकडे वेळोवळी उद््भवणाऱ्या कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी कळविले आहे.(प्रतिनिधी)