अत्यल्प पाणीपुरवठा व चोक झालेल्या गडरलाईनचा मनस्ताप ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:07 IST2021-02-15T04:07:51+5:302021-02-15T04:07:51+5:30
नागपूर : वाठोडा परिसरातील गोपालकृष्णनगर, दर्शन कॉलनीत नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत. या भागात पाणी, रस्ते, गडरलाईनच्या समस्येमुळे नागरिक ...

अत्यल्प पाणीपुरवठा व चोक झालेल्या गडरलाईनचा मनस्ताप ()
नागपूर : वाठोडा परिसरातील गोपालकृष्णनगर, दर्शन कॉलनीत नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत. या भागात पाणी, रस्ते, गडरलाईनच्या समस्येमुळे नागरिक कंटाळले आहेत. मूलभूत सुविधा नागरिकांना मिळाव्यात, अशी मागणी अनेकदा महापालिकेकडे करूनही काहीच कारवाई न करण्यात आल्यामुळे त्यांचा नाईलाज होत आहे. आपल्या समस्यांना त्यांनी ‘लोकमत’कडे वाट मोकळी करून दिली.
गोपालकृष्णनगरात अपुरा पाणीपुरवठा
गोपालकृष्णनगरात रात्री ८ वाजता नळाला पाणी येते. त्यातही केवळ अर्धा तास नळाला पाणी राहते. एवढ्या कमी कालावधीत नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळत नाही. दिवसभर वापरण्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे चकरा मारून टँकरची वाट पाहावी लागते. ही समस्या रोजचीच झाल्यामुळे नागरिक कंटाळले आहेत. त्यामुळे नळाला किमान एक तास पाणी सोडण्याची मागणी ते करीत आहेत.
अरुंद रस्त्यामुळे वाढले अपघात
गोपालकृष्णनगर परिसरात १० फुटांचा अरुंद पांधन रस्ता आहे. हा रस्ता नागरिकांना रहदारीसाठी अपुरा पडत आहे. यातही या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता रुंद करण्याची नागरिकांची मागणी अनेक वर्षांपासून आहे. तरीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे रहदारीसाठी रस्ता उरत नाही. याशिवाय वाठोडा टी पॉईंट चौकात रस्त्यात इलेक्ट्रिकचे खांब लावण्यात आल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळी हे खांब दिसत नसल्यामुळे या चौकात अनेकदा अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे हे खांब त्वरित काढण्याची नागरिकांची मागणी आहे. या भागात रिकाम्या प्लॉटमध्ये कचरा, पाणी साचत असल्यामुळे दुर्गंधी पसरते. डासांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करून या भागात नियमित फवारणी करण्याची गरज आहे. या भागात स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वाहनचालक वेगात वाहने चालवितात. तसेच चेनस्नॅचिंगच्या घटनाही या भागात घडल्या आहेत. त्यामुळे येथे स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी होत आहे.
दर्शन कॉलनीत गडरलाईनमुळे नागरिक त्रस्त
दर्शन कॉलनीतील गडरलाईन जीर्ण झाली आहे. ही गडरलाईन नेहमीच चोक होत असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. गडरलाईन चोक झाल्याने घाण पाणी नळाच्या लाईनमध्ये शिरुन नळाला दूषित पाणी येते. गडरलाईनचे चेंबर खचले असून दुरुस्तीसाठी येणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी गडरलाईनवर नागरिकांनी बांधकाम केल्यामुळे गडरलाईन दुरुस्त करण्यासाठी त्रास होतो. या भागातील जीर्ण झालेली गडरलाईन बदलण्याची नागरिकांची मागणी आहे. या भागातील आरोग्य केंद्राला हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्यासाठी महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळेत २५ खाटांचे रुग्णालय सुरू करण्यासाठी महापालिकेला निवेदन देण्यात आले आहे. याशिवाय जगनाडे चौक ते केडीके कॉलेजपर्यंत स्पीड ब्रेकर आणि वाहतूक दिवे बसविण्याची मागणी आहे.
गडरलाईन बदलविण्याची गरज
‘गडरलाईन जीर्ण झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या भागात महानगरपालिकेने नवी गडरलाईन टाकून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.’
-शीला राठोड, महिला
स्पीड ब्रेकर बसवावे
‘जगनाडे चौक ते केडिके कॉलेजपर्यंत स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वाहनचालक वेगाने वाहने चालवितात. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले असल्यामुळे स्पीड ब्रेकर आणि वाहतूक दिवे लावण्याची गरज आहे.’
-रेखा वारजुरकर, महिला
नळाला पुरेसे पाणी सोडावे
‘गोपालकृष्णनगर परिसरात नळाला केवळ अर्धा तास पाणी येते. नागरिकांना पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. त्यामुळे महानगरपालिकेने या भागात नळाला एक तास पाणी सोडण्याची गरज आहे. यासोबतच परिसरात डासांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी फवारणी करण्याची मागणी आहे.’
-राजेश पौनीकर, नागरिक
रस्ता रुंदीकरण महत्त्वाचे
‘गोपालकृष्णनगरकडे येणारा पांधन रस्ता केवळ १० फुटांचा आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून या रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे.’
-राजू भेंडे, नागरिक
...............