नाट्याभिनयाने पेटविणार वेगळ्या विदर्भाचे आंदोलन

By Admin | Updated: June 23, 2014 01:25 IST2014-06-23T01:25:58+5:302014-06-23T01:25:58+5:30

जगात आजपर्यंत झालेली क्रांती कलावंतांशिवाय आणि कलेशिवाय झालेली नाही, हा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही गीत आणि कवितांनी रण माजविले तर नाट्य प्रयोगांनी समाजमन चेतविले.

Different Vidarbha Movement will play a grand role | नाट्याभिनयाने पेटविणार वेगळ्या विदर्भाचे आंदोलन

नाट्याभिनयाने पेटविणार वेगळ्या विदर्भाचे आंदोलन

जनमंचतर्फे नाट्य कलावंतांचा मेळावा : कलावंतांची सकारात्मक भूमिका
नागपूर : जगात आजपर्यंत झालेली क्रांती कलावंतांशिवाय आणि कलेशिवाय झालेली नाही, हा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही गीत आणि कवितांनी रण माजविले तर नाट्य प्रयोगांनी समाजमन चेतविले. कलावंत प्रत्यक्ष हातात शस्त्र घेत नाही, पण शस्त्र घेण्यास तो बाध्य करू शकतो. कलेत ही विलक्षण ताकद आहे. त्यामुळे कलावंतांच्या नाट्याभिनयाने, पथनाट्यांच्या माध्यमातून विदर्भाचे आंदोलन पेटविले जाईल. यातून संपूर्ण विदर्भ ढवळून काढण्याची आणि लोकांना जागरूक करून वेगळ्या विदर्भासाठी प्रत्यक्ष काम करण्याची इच्छा कलावंतांनी आज व्यक्त केली. यासाठी संपूर्ण विदर्भातून कलावंत एकत्रित झाले होते.
जनमंचच्यावतीने रविवारी नाट्य कलावंतांचा मेळावा वेगळ्या विदर्भासाठी आयोजित करण्यात आला. याप्रसंगी सर्व कलावंतांनी वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आपले मत व्यक्त करीत, या आंदोलनात आपल्या कला माध्यमातून योगदान देण्याची तयारी दर्शवीत आपली सकारात्मक भूमिका उघड केली. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक चंद्रकांत वानखडे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून अ‍ॅड. अनिल किलोर, राजीव जगताप, नाट्य दिग्दर्शक हरीश इथापे, ज्येष्ठ पत्रकार श्याम पेटकर, देवेंद्र लुटे उपस्थित होते. सारेच नाट्यकलावंत असल्याने त्यांच्या बोलण्यात भिडस्तपणा आणि कलात्मकता होती. त्यामुळे कलावंतांची अभिव्यक्ती प्रखर आणि प्रवाही होती. सर्वांनीच वेगळ्या विदर्भासाठी कला माध्यमातून काम करण्याची तयारी दर्शविली. यावेळी हरीश इथापे यांनी प्रत्येक जिल्ह्यात विदर्भातील सर्व कलावंत एकत्र होतील आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी पथनाट्य सादर करून जनजागृती करतील, असे सुचविले. त्यांची ही संकल्पना त्वरित सर्व कलावंतांनी उचलून धरली. प्रारंभी अ‍ॅड. अनिल किलोर यांनी प्रास्ताविकातून वेगळ्या विदर्भाची भूमिका समजावून सांगितली. वेगळा विदर्भ झाल्यावर येथील कलावंतांनही रोजगाराच्या संधी आणि कला सादरीकरणासाठी पोषक वातावरणनिर्मिती होईल, असे ते म्हणाले.
याप्रसंगी हरीश इथापे म्हणाले, वैदर्भीय रंगभूमी आणि झाडीपट्टी समृद्ध आहे. झाडीपट्टीने लोककला आणि परंपरेच्या स्वरूपात नाट्यकला जिवंत आणि प्रवाही ठेवली. संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर गेल्या ६० वर्षांत विदर्भाच्या कलावंतांना नाट्यगृह मिळत नाही. याशिवाय केवळ नागपूर म्हणजे विदर्भ न मानता आपण सर्वांनी व्यापक झाले पाहिजे. कुठलीही चळवळ केवळ नेत्यांच्या भरवशावर चालत नाही. कलावंत, लेखक, कवी यांची अभिव्यक्ती क्रांतीची प्रेरणा ठरते. त्यामुळे या आंदोलनात आम्ही सर्व कलावंत सोबत राहू. याशिवाय कलावंतांना सहकार्य मिळाले तर २५ ते ३० मिनिटांच्या शॉर्ट फिल्म तयार करून त्या गावागावात सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याची कल्पना त्यांनी मांडली. लवकरच वर्धेत लोककलावंतांचा मेळावा आयोजित करून त्यात वेगळ्या विदर्भाची बाजू आपण लावून धरू, असे त्यांनी सांगितले.
श्याम पेठकर यांनी विदर्भ आधीपासूनच वेगळा आहे. आता केवळ शासकीय आणि प्रशासकीयदृष्ट्या तो वेगळा करायचा आहे, असे सांगितले. विदर्भ वेगळा करण्यासाठी कलावंतांनीही आता रस्त्यावर आले पाहिजे. त्याशिवाय कलावंतांच्या समस्या संपणार नाही. प्रत्येक वेळी पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडे आशाळभूतपणे पाहण्यात काहीच अर्थ उरला नाही. याप्रसंगी त्यांनी आपल्या विनोदी आणि खुमासदार उपहासात्मक शैलीत मत व्यक्त केले.
याप्रसंगी देवेंद्र लुटे, सचिन गिरी, रोशन नंदवंशी, संजय भाकरे, हिरालाल पेंटर या कलावंतांनीही आपापली भूमिका व्यक्त करून या आंदोलनाला पाठिंबा दिला. या चर्चेचा समारोप चंद्रकांत वानखडे यांनी केला. ते म्हणाले, ही ऐतिहासिक घटना आहे. कलावंतांच्या अभिव्यक्तीत प्रचंड शक्ती आहे. कलावंतांची कला सामान्य माणसांना प्रेरित करणारी असते. आतापर्यंत विदर्भासाठी जे आयोग, समिती स्थापन करण्यात आलेत त्या सर्वांनीच वेगळ्या विदर्भाच्या बाजूने कौल दिलेला आहे. सर्वसामान्यांना विदर्भ वेगळा हवा आहे आणि त्याची सिद्धता मतदानाने झाली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या चार महिन्यातच हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. कारण त्यानंतर वेगळा विदर्भ होण्यासाठी राजकीय अडचणी निर्माण करण्यात येतील. त्यामुळे या चार महिन्यातच सर्वांनी जोर लावून किमान वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ऐरणीवर आणला पाहिजे. यासाठी प्रतिसाद मिळतो आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून लोक समोर येत आहेत. या कामासाठी लागणारी आर्थिक मदतही लोकांकडूनच घेण्यात येईल. ही मोठी लढाई लढण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी कलावंत दिलिप देवरणकर, कवी ज्ञानेश वाकुडकर, समीर दंडाळे, संजय भरडे, सारनाथ रामटेके, योगेश राऊत, विलास कुबडे, रवी पाटील, अभय अंजीकर, पूजा बन्सोड, विशाल तराळ आदी विदर्भातील आघाडीचे कलावंत उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Different Vidarbha Movement will play a grand role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.