डीजींनी टोचले अधिकाऱ्यांचे कान

By Admin | Updated: July 3, 2014 00:47 IST2014-07-03T00:47:54+5:302014-07-03T00:47:54+5:30

फालतू कामात लक्ष घालू नका. गुन्हेगारांवर जरब बसवा, असे खडे बोल सुनावत पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी आज अनेक पोलीस अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. नागपुरातील गुन्हेगारी

DG gave ear to the officials | डीजींनी टोचले अधिकाऱ्यांचे कान

डीजींनी टोचले अधिकाऱ्यांचे कान

फालतू कामात लक्ष घालू नका : गुन्हेगारांवर जरब बसवा
नागपूर : फालतू कामात लक्ष घालू नका. गुन्हेगारांवर जरब बसवा, असे खडे बोल सुनावत पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी आज अनेक पोलीस अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. नागपुरातील गुन्हेगारी उफाळल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक दयाल यांनी आज जिमखान्यात पोलीस अधिकाऱ्यांची प्रदीर्घ बैठक घेतली. बैठकीला पोलीस आयुक्त के. के. पाठक, सहआयुक्त संजय सक्सेना, अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे यांच्यासह सर्व झोनचे उपायुक्त, सहायक आयुक्त, आणि ठाणेदार हजर होते.
सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत चाललेल्या या प्रदीर्घ बैठकीत त्यांनी नागपुरात उसळी मारलेल्या गुन्हेगारीचा सविस्तर आढावा घेतला. अवघ्या २४ तासात ६ खून झाले. त्यातील खुनाच्या तीन घटना टोळीयुद्धातून घडल्या. टोळीयुद्धाचा भडका उडाल्याने सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे. याशिवाय, बलात्कार, घरफोडी, जबरी चोऱ्या, लुटमार, प्राणघातक हल्ले, खंडणी वसुली, अपहरण असे गंभीर गुन्हे सारखे सुरूच आहेत. त्यामुळे नागपूरकर जनता अस्वस्थ आहे. लोकमतने नागपुरातील उफाळलेल्या गुन्हेगारीचे वृत्त २४ जूनच्या अंकात सविस्तर आणि ठळकपणे प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालनालयानेही गंभीरपणे घेतली. लोकमतच्या वृत्ताची चर्चा आठवडाभरापासून गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालनालयात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, चार दिवसांपूर्वी पोलीस महासंचालकांचा नागपूर दौरा ठरला. येथे ते अधिकाऱ्यांची ‘खबरबात‘ घेणार हे अपेक्षित होते. तसेच झाले. शहरात फोफावलेली गुन्हेगारी, त्याची कारणे, गंभीर गुन्ह्यांचा रखडलेला तपास, मोकाट गुंड, गुंडांच्या टोळ्या, त्यांच्या हालचाली, कार्यपद्धती अन् त्या- त्या भागाच्या पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका याबाबतचा पोलीस महासंचालक दयाल यांनी आजच्या बैठीकीत सविस्तर आढावा घेतला. खून, हाणामाऱ्या, खंडणी वसुली, चेनस्नॅचिंग, घरफोड्या, टोळीयुद्ध, मोकाट गुंड तसेच भूमाफियांचे विषय चर्चेला घेत दयाल यांनी अनेक ठाणेदारांना धारेवर धरले. हॉटेल, पानटपऱ्या बंद केल्याने गुन्हेगारी नियंत्रणात येणार नाही. फालतू कामात लक्ष घालण्याऐवजी गुन्हेगारांवर वचक निर्माण करा, असे सुनावतानाच महिन्याभरात हे सर्व झाले पाहिजे, असा अल्टिमेटमही महासंचालकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. नंदनवन, लकडगंज, गिट्टीखदान, अंबाझरी, प्रतापनगर आणि सीताबर्डीतील अधिकाऱ्यांसोबत पोलीस महासंचालकांनी ‘खास चर्चा‘ केली. गिट्टीखदानच्या ठाणेदारांनी चांगले ‘प्रेझेंटेशन‘ दिले. पहिल्या सत्रातील बैठक खरडपट्टीचीच होती.
दुसऱ्या सत्राच्या बैठकीत पोलीस उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त आणि पोलीस आयुक्तांना डीजींनी संबोधित केले. गुन्हेगारी नियंत्रणासाठी काय उपाययोजना करणार आहात, हे जाणून घेतानाच स्थानिक पोलिसांना मुख्यत्वे कोणत्या अडचणी येत आहे, त्यासुद्धा त्यांनी जाणून घेतल्या. (प्रतिनिधी)

Web Title: DG gave ear to the officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.