मारेकऱ्यांचे मनसुबे उद्ध्वस्त
By Admin | Updated: June 3, 2015 02:33 IST2015-06-03T02:33:33+5:302015-06-03T02:33:33+5:30
पैशाच्या लालसेपोटी एका कुटुंबाचे स्वप्न संपविणाऱ्या क्रूर मारेकऱ्यांचे मनसुबे पोलिसांनी उध्वस्त केले.

मारेकऱ्यांचे मनसुबे उद्ध्वस्त
नरेश डोंगरे नागपूर
पैशाच्या लालसेपोटी एका कुटुंबाचे स्वप्न संपविणाऱ्या क्रूर मारेकऱ्यांचे मनसुबे पोलिसांनी उध्वस्त केले. नियतीनेही या क्रूरकर्म्यांच्या वाटेत काटे पेरले. ज्या पैशासाठी मारेकऱ्यांनी मोनिका किरणापुरेची निर्घृण हत्या केली ते पैसे मारेकऱ्यांच्या वाट्याला आले खरे, परंतु त्याचा उपभोग ते घेऊ शकले नाही. निष्पाप मोनिकाच्या रक्ताने रंगलेली सुपारीची रक्कम, सोन्याचे दागिने अन् कपडेही पोलिसांनी आरोपींकडून लगेच हिसकावून घेतले. एकाचे लग्नही मोडले. साऱ्यांचेच आप्तस्वकीय दूर सारले गेले. चार वर्षांपासून आरोपी कारागृहात आहेत. आता आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे पुढचे आयुष्य त्यांना कारागृहाच्या भेसूर भिंतीआडच रडतकुढत काढावे लागणार आहे. पैशासाठी कुणाच्याही जीवावर उठणाऱ्या गुन्हेगारांसाठी हा एक धडाच ठरावा.
रामटेकनजीकच्या नगरधन या छोट्याश्या खेडेगावातून गरिबीशी झूंजत मोनिका (वय २३) शिकत होती. अभियंता बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती आपल्या आईवडीलांपासून दूर नागपुरातील वस्तीगृहात राहात होती. मोनिका तिच्या आईवडीलांसाठी केवळ एक मुलगी नव्हती. तर, किरणापुरे कुटुंबीयांचे ते स्वप्न होती.
११ मार्च २०११ ला नेहमीप्रमाणे ती वस्तीगृहातून क्लासला जात असताना नंदनवनच्या दर्शन कॉलनी ते श्रीनगर मार्गावर तिची अमाणूष हत्या करण्यात आली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. मात्र, हा खून कुणी आणि कशासाठी केला, ते कळायला मार्ग नव्हता. जंग जंग पछाडूनही आरोपीचा पोलिसांना सुगावा लागत नव्हता. घटना घडून एक आठवडा, दोन आठवडे झाले तरी मारेकरीच काय त्यांचा धागादोराही गवसत नव्हता. दुसरीकडे नागरिकांचे मोर्चे, निदर्शने सुरू झाली होती. जनभावना भडकत असल्याने पोलिसांवर प्रचंड दडपण वाढले होते. या पार्श्वभूमीवर, तत्कालिन पोलीस आयुक्त डॉ. अंकूश धनविजय यांनी पारंपारिप तपासाला फाटा देत तपासाचा वेगळा फंडा अवलंबला.
महिला पोलीस बनल्या विद्यार्थिनी
ज्या वसतीगृहात मोनिका राहात होती. त्या वस्तीगृहात महिला पोलीस कर्मचारी चक्क विद्यार्थीनी म्हणून राहायला गेल्या. त्यासाठी आयुक्त डॉ. धनविजय आणि तपास अधिकारी माधव गिरी यांनी वसतीगृहाच्या संस्थाध्यक्षाची मदत घेतली. पहिल्या दिवसांपासूनच दररोज रात्री शहरातील २५ अधिकारी आणि १०० कर्मचारी मध्यरात्रीपर्यंत तपासाचा अहवाल आयुक्तांसमोर ठेवायचे. त्या आधारे दुस-या दिवसाच्या तपासाची दिशा ठरवली जात होती. चार-पाच दिवसानंतर, ‘वसतीगृहातील वृशालीचे काटोलच्या कुणाल अनिल जयस्वाल (वय २४) या तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि तो तिला संपवण्याची भाषा वापरू लागला होता‘, हा धागा पोलिसांच्या हाती लागला. तो पकडून पोलिसांनी कुणालचा मोबाईल नंबर ट्रॅक केला.
आरोपी पळाले बल्लारपूरला
दरम्यान, हत्या करवून घेतल्यानंतर आरोपींच्या हालचालीवर सूत्रधार कुणालची बारीक नजर होती. सोनेकरला अटक केल्याचे कळताच कुणाल प्रदीप सहारेसोबत बल्लारपूरला (चंद्रपूरला) नातेवाईकांकडे पळून गेला. तपास अधिकारी माधव गिरी यांनी लगेच बल्लारपूरचे तत्कालीन ठाणेदार एस. शरणागत यांना कळवले.
मोनिकाच्या हत्येनंतर साखरपुडा
बावीसव्या दिवशी मोनिकाच्या हत्याकांडाचा सूत्रधार हाती लागल्यानंतर तपासाची चक्रे अधिकच गतिमान झाली. तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. मोनिकाच्या हत्येनंतर आरोपींनी वृशाली ऐवजी मोनिकाला मारल्यामुळे कुणालने आरोपींनी सुपारीचे सव्वालाख रुपये देण्याचे अमान्य केले. तर, हे प्रकरण भलत्याच वळणावर गेल्याचे सांगून ठरल्यापेक्षा जास्त रक्कम दिली नाही तर तुझाही गेम करू, अशी धमकी आरोपींनी कुणालला दिली. त्यामुळे कुणालने आरोपींना १ लाख ६० हजार रुपये (ठरल्यापेक्षा जास्त रक्कम) दिली. त्यातील ५० हजार श्रीकांत सोनेकरने घेतले. ५० हजार उमेश ऊर्फ भुऱ्या मोहन मराठे (वय २४) याच्या हिश्श्याला तर, ३० हजार राजू यादवच्या हिश्श्याला आले. उर्वरीत रक्कम आरोपींनी खाण्यापिण्यात आणि कपडे घेण्यात उडवली. हत्येनंतर लगेच उमेशने सुपारीच्या रक्कमेतून आपल्या प्रेयसीसाठी सोने आणि कपडे घेतले. साखरपुडाही केला आणि स्वत:चे लग्नही काढून घेतले. पोलिसांनी श्रीकांत आणि उमेशकडून रक्कम, सोने तसेच कपडे जप्त केले.
सहा लाख मोबाईलमधून हुडकला आरोपी
घटना घडलेल्या परिसरातील मोबाईल टॉवरचे घटनेच्या पुर्वी आणि नंतरच्या काही तासातील लोकेशन ट्रेस करण्यात आले. तब्बल ६ लाख कॉल्सची या टॉवरवरून आवक-जावक (बोलणी) झाली होती. त्यातील एक क्रमांक कुणाल जयस्वालचा होता आणि त्याने घटनेच्या पुर्वी आणि नंतर श्रीकांत भाऊचरण सोनेकर (वय २७) या हुडकेश्वरमधील तरुणाशी प्रदीर्घ बातचित केल्याचे उघड झाले. तो धागा धरून पोलिसांनी ३० मार्चला सोनेकरला अटक केली. त्याने मोनिकाच्या नव्हे तर भलतीच्याच खुनाची सुपारी घेतल्याचे मान्य केले. ही सुपारी कुणालकडून घेतल्याचेही सांगितले.