नागपूर : नागपूर शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने ओसीडब्ल्यूकडे (ऑरेंज सिटी वॉटर) जबाबदारी सोपविली. मात्र, त्यानंतरही पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी कमी झालेल्या नाहीत. पदाधिकार्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याची महापौर अनिल सोले यांनी गंभीर दखल घेतली असून ओसीडब्ल्यूवर नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर जलकुंभांचे काम पूर्ण करण्याचे निर्देश वर्षभरापूर्वी देऊनही त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे ओसीडब्ल्यूला नोटीस बजावण्याचे निर्देश महापौरांनी एनईएसएलला दिले आहेत. शहरात ज्या भागात जलवाहिन्यांचे जाळे आहे, तेथे कुठल्याही कारणाने टंचाई निर्माण झाली तर नागरिकांना पर्यायी पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ओसीडब्ल्यूवर आहे. परंतु ओसीडब्ल्यूने ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडलेली नाही. महापौर अनिल सोले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एनईएसएल (नागपूर एन्व्हायर्नमेन्टल सर्व्हिसेस लि. ) ची बैठक झाली. या बैठकीत महापौरांनी ओसीडब्ल्यूच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाल येथील किल्ला भागात जलकुंभ बांधकाम सुरू करण्याबाबत वर्षभरापूर्वी ओसीडब्ल्यूला निर्देश देण्यात आले होते. परंतु वर्षभरात ओसीडब्ल्यूने या निर्देशाकडे डोळेझाक केली. त्यामुळे या भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ओसीडब्ल्यूने या बांधकामाला अद्यापही सुरु वात न केल्याबाबत महापौर चांगलेच संतप्त झाले. त्यांनी ओसीडब्ल्यूला नोटीस देऊन यावर स्पष्टीकरण मागण्याचे निर्देश एनईसीएलला दिले. बोरियापुरा प्रभागात मेन फिडर लाईनवरील व्हॉल्व हाताळताना असामाजिक तत्त्वाचा त्नास असल्याचा मुद्दाही ऐरणीवर आला. असामाजिक तत्त्वांचा विरोध मोडित काढा तसेच या परिसरात नवीन जाळे टाकण्यास विरोध करणार्यांची गय न करता कामे करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. या संदर्भात तातडीने आयुक्तांनी बैठक घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले. या बैठकीत जलप्रदाय समितीचे सभापती सुधाकर कोहळे, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता अजीजूर रहमान उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जलवाहिनी असूनही पाणीटंचाई कशी ?
By admin | Updated: May 16, 2014 00:53 IST