विभागप्रमुखांमुळे अडली ‘जीवनदायी’
By Admin | Updated: September 19, 2015 03:57 IST2015-09-19T03:57:01+5:302015-09-19T03:57:01+5:30
गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना मेडिकलच्या विभाग प्रमुखांमुळे गेल्या १५ दिवसांपासून ठप्प पडली आहे.

विभागप्रमुखांमुळे अडली ‘जीवनदायी’
देयक प्रमाणितच केले नाही : पुरवठादाराने औषध पुरवठा केला ठप्प
नागपूर : गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना मेडिकलच्या विभाग प्रमुखांमुळे गेल्या १५ दिवसांपासून ठप्प पडली आहे. संबंधित विभागाचे विभाग प्रमुख देयक प्रमाणितच करीत नसल्याने औषध पुरवठादार संस्थेची कोट्यवधीचे देयके प्रलंबित पडली आहेत. परिणामी संस्थेने औषधांचा पुरवठाच बंद केल्याने गरीब रुग्णांचे हाल होत आहेत.
या योजनेत मंजुरी मिळालेल्या लाभार्थ्यांना औषधे व शस्त्रक्रियेचे साहित्य पुरवठा करण्याची जबाबदारी मेडिकलच्याच को. आॅप. कन्झ्युमर्स स्टोर्सकडे सोपविली आहे. २०१३ पासून ही संस्था औषधे पुरवठा करीत आहे. विशेष म्हणजे, नियमानुसार दर पत्रकावर (आरसी) औषधे विकत घेण्याचा नियम असताना ही संस्था १० टक्क्यांनी महागडे औषध देत आहे. योजनेतील लाभार्थ्यांवरील उपचार पूर्ण झाल्यानंतर औषधांची देयके संबंधित विभाग प्रमुखांकडून प्रमाणित होणे व त्यावर स्वाक्षरी होणे अपेक्षित आहे. परंतु अनेक प्रमुखांनी २०१३ पासून देयके प्रमाणितच केलेली नाही. यामुळे पुरवठादार संस्थेचे १ कोटी २० लाख थकलेले आहे. (प्रतिनिधी)