मानवी भावभावनांचे क्षण पकडणारे प्रदर्शन
By Admin | Updated: August 23, 2015 03:04 IST2015-08-23T03:04:50+5:302015-08-23T03:04:50+5:30
आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आपल्या हातून निसटून जातो. कारण काळ नेहमी समोरच जातो.

मानवी भावभावनांचे क्षण पकडणारे प्रदर्शन
नागपूर : आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आपल्या हातून निसटून जातो. कारण काळ नेहमी समोरच जातो. पण आयुष्यात अनेक घटना आपल्या लक्षात राहतात. त्या मानसिक आणि भावनिक पातळीवर असतात. एखादा क्षण पकडता आला तर...मस्तीचा, आनंदाचा, मित्रमैत्रिणींच्या एकत्रित असण्याचा, आपल्या प्रियजनांच्या खळखळून हसण्याचा, बाळाच्या पहिले पाऊल टाकण्याचा, त्याच्या शाळेचा पहिला दिवस आणि असे कितीतरी क्षण. हो हा क्षण बांधून ठेवता येतो, पकडून ठेवता येतो. ही किमया साधते ती छायाचित्रामुळेच. मानवी भावभावनांचे अप्रतिम छायाचित्रे असलेले प्रदर्शन म्हणजे स्मरणरंजनाचा अनोखा सोहळाच.
जवाहरलाल आर्ट गॅलरीत आॅरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबच्यावतीने २० वे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. वर्ल्ड फोटोग्राफी डे निमित्त या प्रदर्शनात दोन गट ठेवण्यात आले. त्यात व्यावसायिक फोटोग्राफर्स आणि हौशी छायाचित्रकार असे गट होते. व्यावसायिक गटासाठी आनंद हा विषय ठेवण्यात आला आणि हौशी गटासाठी विषयाचे बंधन नव्हते. या प्रदर्शनाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद सध्या मिळतो आहे. आनंदालाही अनेक स्तर असतात, अनेक छटा असतात, ही भावना नेमकेपणाने पकडण्याचा प्रयत्न व्यावसायिक छायाचित्रकारांनी मोठ्या कौशल्याने केला आहे. या छटा हौशी चित्रकारांनी नेमकेपणाने कॅमेऱ्यात टिपल्या आहेत. यात वन्यप्राणी, निसर्ग, मानवी चेहरे यातून विरह, उत्कटता, आनंद, वेदना अशा भावना जिवंत केल्या आहेत. हे प्रदर्शन २३ आॅगस्टपर्यंत रसिकांसाठी खुले आहे. हे प्रदर्शन आणि स्पर्धेसाठी जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनचे विशेष सहकार्य लाभले. चेतन जोशी, दिनेश मेहर, रमाकांत झाडे, प्रदीप निकम, अविनाश लोंढे, राजन गुप्ता, जयेश वासानी, सुनील पिंपळापुरे, सुनील इंदाणे आदींनी सहकार्य केले.