शाळा प्रशासनाला माहिती न देता शाळेत विकास कामासाठी तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST2021-05-27T04:08:32+5:302021-05-27T04:08:32+5:30
अंकिता देशकर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील एका शाळेत विकासाच्या नावाखाली तोडफोड करण्यात आल्याची बाब ...

शाळा प्रशासनाला माहिती न देता शाळेत विकास कामासाठी तोडफोड
अंकिता देशकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील एका शाळेत विकासाच्या नावाखाली तोडफोड करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे यासंबंधात शाळा प्रशासनाला कुठलीही कल्पना देण्यात आली नव्हती. कोरोनाच्या महामारीत असा प्रकार झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
वृंदन बावनकर या पवनी येथे आनंदम शाळा (अगोदरची पवन पब्लिक स्कूल) संचालित करतात. शाळेला सुरक्षाभिंत नसून चारही बाजूने शाळा उघडी आहे. पवनी नगर परिषदेने पुरविलेल्या इमारतीत भाड्याने शाळा चालते. ही इमारती फार जुनी असून, वाईट स्थितीत आहे. कोरोनामुळे शाळा बंद आहे. शाळा कर्मचारी व विद्यार्थी अनेक काळापासून शाळेत आलेले नाही. परंतु ज्यावेळी त्यांनी शाळेत पाहणी केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. शाळेतील स्वच्छतागृह तोडण्यात आले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर तातडीने बावनकर यांनी पवनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सीईओ चंदन पाटील यांना संपर्क केला. मात्र ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही. एकीकडे कोरोनामुळे नगर परिषदेकडे निधीची कमतरता असताना दुसरीकडे शाळेच्या विकासासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही बाब कोड्यात टाकणारी आहे, असे बावनकर यांनी सांगितले.
२०१२ साली ही शाळा तोडण्यात आली होती व त्यानंतर भंडारा जिल्हा न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी गोळा करण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे ही प्रक्रिया थांबली आहे. याबाबत पवनी नगर परिषदेच्या सीईओंना संपर्क केला असता, मी आताच पदाची जबाबदारी सांभाळली आहे, त्यामुळे याची नेमकी माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. बावनकर यांनी संपर्क केला असता, हा प्रकार कळला. शाळा मूलतः नगर परिषदेची असल्याने मी अभियंत्यांना विचारणा केली. खराब स्थिती असल्याने स्वच्छतागृह पाडण्यात आले. सध्या तेथे फायबरची स्वच्छतागृहे बसविण्यात येतील व आवश्यकता भासल्यास विद्यार्थी-शिक्षकांसाठी नवीन स्वच्छतागृह बांधण्यात येईल, असे पाटील यांना स्पष्ट केले. न्यायालयात प्रकरण असताना व शाळा प्रशासनाला कुठलीही माहिती न देता अशाप्रकारे तोडफोड का करण्यात आली, हे प्रश्न अनुत्तरितच आहेत.